Saturday, November 30, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- नेम जया नाहीं एकादशी व्रत । (अभंग ३४)

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- नेम जया नाहीं एकादशी व्रत । (अभंग ३४)

नेम जया नाहीं एकादशी व्रत । जाणावें ते प्रेत सर्व लोकीं ।। १ ।।
त्याचे वय नित्य काळ लेखिताहे । रागें दात खाय कराकरा ।। २ ।।
जयाचिये द्वारी तुळशीवृंदावन । नाहीं ते स्मशान गृह जाण ।। ३ ।।
विठोबाचे नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचे ।। ४ ।।
तुका म्हणे त्याचे काष्ठ हात पाय । कीर्तना नाव जाय हरिचिया ।। ५ ।।

अर्थ : "ज्या पुरुषाला एकादशीच्या व्रताचा नेम नाही तो पुरूष सर्व लोकात प्रेतवत आहे. त्या पुरूषाचे जाणाऱ्या आयुष्याचे दिवस काळ नेहमी मोजत असतो आणि अतिशय रागाने त्याच्यावर दात खातो" या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि जो कोणी एकादशीला (आषाढी, कार्तिकी) पंढरपूरला जाण्याचे व पांडुरंगाला भेटण्याचे व्रत करत नाही (आषाढी, कार्तिकी वारी करत नाही) त्याच्या जगण्यात अर्थ नाही. तो पुरूष म्हणजे एक प्रकारचा नश्वर जीवच आहे. तो सर्व लोकात प्रेतवत आहे. त्याच्यामागे काळ यमदूतासारखा उभा असतो आणि तो जे दिवस जगत असतो ते दिवस काळ मोजत असतो (तुकाराम महाराजांना ते दिवस काळासारखे वाटतात). काळ रागाने त्याच्याकडे बघत असतो. 
          महिन्याला दोन याप्रमाणे वर्षात २४ एकादशी असतात. यात आषाढी व कार्तिकी एकादशी सगळ्यात पवित्र मानली जाते. एकादशीच्या दिवशी उपवास करावा, विठ्ठलाचे नामःस्मरण करावे, भजन-कीर्तन करावे, हरिपाठ वाचावा तसेच आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करावी व विठ्ठलाचे दर्शन घ्यावे हे व्रत केल्याने निश्चित पुण्य लागते. 
          "ज्याच्या घरासमोर तुळशीवृंदावन नाही ते घर स्मशानावत आहे" याचा अर्थ आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीला महत्व आहे. आपण तुळशीला पवित्र मानले आहे. तुळस विष्णूची आवडती वनस्पती आहे. तिचा उपयोग पुजेसाठी व औषधासाठी होतो. वारकारीसुद्धा पांडुरंगाला भेटायला जाताना बरोबर तुळशीवृंदावन घेवून जातात. तुकाराम महाराजांच्या मते ज्याला तुळशीचे महत्व पटले नाही, त्याच्या घरासमोर तुळशीवृंदावन नाही त्याचे घर स्मशानासारखे रखरखीत आहे तसेच त्याच्या कुळामध्ये विष्णू उपासक नसेल तर त्याचे आयुष्य नदीत बुडून जाईल. 
          "ज्याचे तोंड विठ्ठलनामाचा उच्चार करीत नाही ते तोंड नाही, ते चांभाराचे कातडे भिजवण्याचे कुंड आहे. जो पुरूष हरिकीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लाकडे आहेत." तुकाराम महाराजांनी या ओवीतून पांडुरंगाच्या भक्तीबद्दल असे म्हणले आहे कि, ज्याचे तोंड विठ्ठलनामाचा उच्चार करीत नाही (तोंडाने पांडुरंगाचे नाव घेत नाही) ते तोंड सगळ्यात वाईट आहे इतके वाईट कि चांभार ज्या कुंडात कातडे भिजवतो व त्यामुळे कुंडाला दुर्गंधी येते त्याप्रमाणे त्याच्या तोंडाला दुर्गंधी येते. तसेच जो पुरूष हरिकीर्तनाला (विठ्ठालाच्या कीर्तनाला) जात नाही त्याचे हातपाय धडधाकट असूनसुध्दा काही कामाचे नाहीत. ते निर्जीवच (लाकडासमान) आहेत .







































Saturday, November 16, 2019

गोष्ट -- सर्वात श्रेष्ठ कोण ?


जल 
वायू 

अग्नी 
गोष्ट -- सर्वात श्रेष्ठ कोण ?

          एकदा जल, वायू, अग्नी हे देव गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता सर्वात श्रेष्ठ कोण ? या विषयावर त्यांचे भांडण चालू झाले. जल म्हणाला, "मी पाऊस पडतो. पावसामुळे नदी नाल्याना पाणी येते. सर्व प्राणिमात्रांना प्यायला पाणी लागते. पाणी नसेल तर या पृथ्वीतलावर कोणी जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळे मी श्रेष्ठ." वायू म्हणाला, "माझ्यामुळे सगळीकडे हवा खेळली जाते. मी लोकांना व प्राण्यांना श्वास घ्यायला मदत करतो. मी जर हवा वाहणे बंद केले तर भूतलावरील सर्व प्राणीमात्र श्वासाविना गत:प्राण होतील. त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ." दोघांचे भांडण ऐकून अग्नीला राहवले नाही. तोही म्हणाला, "खरं तर या जगात मी श्रेष्ठ. माझ्यामुळे सर्वांना प्रकाश मिळतो. सर्वांचा अंधार दूर करतो त्यामुळे मी श्रेष्ठ." असे तिघांचे भांडण चालू होते. 
          तिथून एक तेजस्वी पुरूष चालला होता. त्या तिघांनी त्याला पाहिले व अडविले. तिघेही त्याला म्हणू लागली कि आमच्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण ? तेजस्वी पुरूषाने तिघांना एकदा न्याहळले. मग त्याने एक युक्ती केली. आपल्याजवळील एक छोटीसी वस्तू काढून ठेवली व अग्नीला म्हणाला, तू जर श्रेष्ठ असशील तर हि वस्तू जाळून दाखव. अग्नी म्हणाला, त्यात काय ? मी अख्खे ब्रम्हांड जाळू शकतो. हि वस्तू जाळायला मला काहीच वाटणार नाही. असे म्हणून त्याने ज्वाळांचे प्रचंड झोत त्या वस्तूवर टाकले. परंतु ती वस्तू काही अग्नीला जाळता आली नाही. वायुनेही आपली सर्व शक्ती एकवटून ती वस्तू हलवण्याचा प्रयत्न केला परंतू ती वस्तू काही जागची हलली नाही. पाण्यानेही प्रचंड लाटा निर्माण करून ती वस्तू बुडवण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही प्रयत्न निष्फळ ठरले. ते अहंकारी देव खजील झाले. तेजस्वी पुरूषाला शरण गेले. तेव्हा तेजस्वी पुरूष म्हणाला, "असे मी श्रेष्ठ म्हणून भांडता कसले ? खरे तर या जगात कोणीच श्रेष्ठ नाही कि कनिष्ठ नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करीत असतो. प्रत्येकाजवळ कुठली ना कुठली क्षमता, ताकत, गुण असतात. हे सर्व ओळखून त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद रहाणार नाही. एवढे बोलून तो तेजस्वी पुरूष अंतर्धान पावला. 

तात्पर्य : नेमून दिलेले कुठलेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा भेद न करता  आनंदाने करावे.



















Friday, November 8, 2019

चारोळी -- बिरोळी

चारोळी -- बिरोळी 


आयुष्य म्हणजे काय 
जगणं नि मरणं,
स्वतःसाठी का होईना 
काही तरी करणं !
-----------------------

 डोळ्यातील अश्रूंना 
दोन अर्थ असतात,
एकात दुःखाचे पर्वत 
एकात सुखाचे तरंग !
-----------------------


अत्तरदाणी - गुलाबपाणी 
थोडं अत्तर, थोडं पाणी,
जीवन हे असंच आहे 
थोडा लाभ, थोडी हानी !
-----------------------

जीवन म्हणजे सुरेल संगीत,
नुसतेच नसावे गीत,
अंगी गुण असावे मनमीत 
तेव्हाच होते भावनांची जीत !
---------------------------

शहाणपणाच्या शब्दापेक्षा 
मायेचा स्पर्श हवा,
आभाळीच्या सूर्यापेक्षा 
भाकरीचा चंद्र खरा !
-------------------------

शुभकार्याच्या शुभप्रसंगी 
गणेशाला आधी नमन ।
वाजतगाजत करू स्वागत 
गणेशाचे आगमन ।।
-------------------------













Tuesday, November 5, 2019

अवीट गोडीचे गाणे -- जा जा जा मेरे बचपन, कहीं जा के छुप नादां

  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


अवीट गोडीचे गाणे - जा जा जा मेरे बचपन,
कहीं जा के छुप नादां   
 
       "जा जा जा मेरे बचपन" हे जंगली चित्रपटातील गीत आहे. हा चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात शम्मी कपूर,
सायरा बानो, शशिकला, ललिता पवार, अनुप कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. सायरा बानो हिचा हा पहिलाच चित्रपट आहे. 
या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील अभिनयामुळे सायरा बानोला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी फिल्म फेयर पुरस्काराचे 
नामांकन मिळाले. 
       या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन सुबोध मुखर्जी यांनी केले. या चित्रपटातील गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले,
मुकेश यांनी गायली आहेत. शैलेंद्र व हसरत जयपुरी यांनी गीते लिहिली आहेत तर शंकर जयकिशन यांनी संगीत दिले आहे. 
"जा जा जा मेरे बचपन" हे गीत सायरा बानोवर चित्रित झाले आहे. हे गीत लता मंगेशकर यांनी गायले असून या गीताला शंकर जयकिशन 
यांनी संगीत दिले आहे. या गीताचे बोल हसरत जयपुरी यांनी लिहिले आहेत. लता मंगेशकर यांच्या गोड आवाजाने व सायरा बानोच्या सुंदर 
अदाकारीने हे गीत लक्षात राहते.  
 
 
 
जा जा जा मेरे बचपन, कहीं जा के छुप नादां   
ये सफ़र है अब मुश्किल, आने को है तूफ़ाँ 
जा जा जा मेरे बचपन... 2

ज़िंदगी को नये रंग मिलने लगे
एक किरन छू गयी, फूल खिलने लगे - २
जा जा जा मेरे बचपन, कहीं जा के छुप नादां   
ये सफ़र है अब मुश्किल, आने को है तूफ़ाँ
 
एक कसक हर घड़ी दिल में रहने लगी 
जो के तड़पा गयी, फिर भी अच्छी लगी - २
जा जा जा मेरे बचपन, कहीं जा के छुप नादां   
ये सफ़र है अब मुश्किल, आने को है तूफ़ाँ 
 
गाना / Title: जा जा जा मेरे बचपन, कहीं जा के छुप नादान - jaa jaa jaa mere bachapan, kahii.n jaa ke chhup naadaan
चित्रपट / Film: Junglee
संगीतकार / Music Director: शंकर - जयकिशन-(Shankar-Jaikishan)
गीतकार / Lyricist: हसरत जयपुरी-(Hasrat Jaipuri) गायक / Singer(s): लता मंगेशकर-(Lata Mangeshkar)





 

Sunday, November 3, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ५ व ६)


तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ५ व ६)

आम्हां घाली पाठीकडे । आपण कळिकाळासी भिडे ।। ५ ।।
तुका म्हणे कृपानिधी । आम्हां उतरी नावेमधीं ।। ६ ।।

अर्थ : मोठया संकटप्रसंगी आम्हा भक्तजनांना पाठीशी घेऊन आपण कळिकाळाशी झगडण्यास तयार होते. तुकाराम महाराज म्हणतात, "कृपेचा केवळ ठेवाच जो पांडुरंग, तो आम्हाला जन्ममृत्युरूपी संसारनदीतून आपल्या नामनौकेने पार उतरून नेतो."

भावार्थ : भक्तांवर कितीही मोठे संकट येवो, विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून येतो व भक्तांना संकटातून सोडवतो. संत गोरा कुंभार माती तुडवत होते व विठ्ठलनामात दंग होते. माती तुडवता तुडवता त्यांच्या पायाखाली त्यांचेच लहान मुल आले व तुडवले गेले हे देखील त्यांना कळले नाही. जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांनी विठ्ठलाचा धावा केला. गोरा कुंभारांनी केलेला धावा ऐकून विठ्ठलाने मेलेले मुल जिवंत केले. जनाबाईवर चोरीचा आळ आला. तिला सुळावर चढवण्याची शिक्षा झाली. जेव्हा तिला सुळावर चढवले तेव्हा तिने विठ्ठलाचा धावा केला. तिने केलेला धावा ऐकून विठ्ठलाने सुळाचे पाणी केले व जनाईला संकटातून सोडवले. मंगळवेढयाला मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नावाचून तडफडू लागले. दामाजींना हे दुःख पाहवले नाही. त्यांनी लोकांसाठी सरकारी गोदाम (कोठार) खुले केले व लोकांना पाहिजे तेवढे धान्य वाटून टाकले. हि वार्ता बादशहाला कळली. बादशहाने लगेच दामाजीला बेडया घालून आणण्याची व तुरूंगात टाकण्याची आज्ञा केली. हि वार्ता ऐकून दामाजी विठ्ठलाचा धावा करू लागला. विठ्ठलाने महाराचे रूप घेऊन धान्याचे सर्व पैसे बादशहाला दिले. बादशहाने दामाजीला सोडण्याची आज्ञा केली. विठ्ठलाने महाराचे रूप घेऊन दामाजींना मदत केली. 
          तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे वरील प्रसंगात संकटाच्या वेळी विठ्ठल भक्तांच्या पाठीशी उभा राहिला व स्वतः संकटांशी तोंड देण्यास तयार झाला व भक्तांना सुखरूप ठेवले. 
               पांडुरंगाची भक्ती केल्याने, त्याचे नित्यनियमाने नामस्मरण केल्याने पांडुरंग संसारपाशातून सोडवतो. आपले मन संसारात गुरफटले असेल तर पांडुरंग त्यातून सोडवतो व मनाला सुख, आनंद प्राप्त करून देतो. विठ्ठलनामामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. विठ्ठलाची भक्ती केल्यामुळे संसारातील सर्व अडचणी व कटकटीतून मुक्तता मिळते. पातकांचे क्षालन होते. मनातील लोभ, अहंकार, गर्व, आशा, वासना हे विकार जाऊन मन भक्तीमार्गाकडे व सत्कर्माकडे धावू लागते. मनात चांगले विचार येतात त्यामुळे मन पवित्र, निर्मळ होते. सतत विठ्ठलभक्तीमुळे संपुर्ण देह विठ्ठलमय होतो. जो भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करतो त्याला वरील सर्व फायदे मिळतात. विठ्ठल त्याच्यावर कृपादृष्टी ठेवतो. त्याला जन्ममृत्यूरूपी संसारनदीतून उतरून नेतो म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून व संसाराच्या पाशातून सोडवतो. 













 































































 

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ३ व ४)


तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी ३ व ४)

कोठें दिसे न पाहता । उडी घाली अवचिता ।। ३ ।।
सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणचि घोटी ।। ४ ।।

अर्थ : एरवी तिला पाहू गेले; तर ती कोठेही दिसत नाही, पण भक्ताने हाका मारिल्याबरोबर अकस्मात उडी घालिते. आम्हा भक्तांकरिता सुख ठेविते व आमच्यावरचे दुःख आपणच गिळिते. 

भावार्थ : पांडुरंग हे असे दैवत आहे कि, एखादा भक्त संकटात सापडला असेल व तो मदतीसाठी पांडुरंगाची आराधना करत आहे, पांडुरंगाला आर्त हाक मारत आहे तर पांडुरंग त्याची हाक ऐकून लगेच धावून येतो व भक्ताला संकटातून सोडवतो. जो कोणी विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करेल, त्याचे नित्यनियमाने नामस्मरण घेईल, विठ्ठलाला भजेल त्यालाच विठ्ठल आपले दर्शन देईल. 
               सर्व संत मंडळी विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करत होते, त्याचे नित्यनियमाने नमःस्मरण घेत होते. त्यांच्यावर कितीही संकटे आली, दुःख, वेदना झाल्या तरीही त्यांची विठ्ठलावरील भक्ती तसूभरही कमी झाली नाही कि त्यांच्या भक्तीत कधी खंड पडला नाही. उलट त्यांची हि अंतःकरणापासून केलेली भक्ती पाहून विठ्ठलही भारावला. विठ्ठलाने या संतांना आपल्या हृदयात स्थान दिले. त्यांच्यावर कृपाछत्र धरले. अडचणीच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून आला व त्यांना संकटातून सोडवले. विठ्ठलाने या संतमंडळींची सर्व दुःखे, वेदना स्वतः झेलल्या व त्यांना सुख प्राप्त करून दिले. 
               तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती केली तरच विठ्ठल भक्तांच्या मदतीला धावून येतो पण जर भक्तीच केली नाही तर विठ्ठल दर्शन देणार नाही म्हणजेच एरवी विठ्ठलाला नुसतेच पाहायचे म्हणले तर विठ्ठल दिसणार नाही कारण विठ्ठलाबद्दल तसा भक्तिभाव मनात असावा लागतो. विठ्ठल हा भक्तीभावाचा भुकेला आहे. 




























































 

Saturday, November 2, 2019

कविता -- गुलाबाची गोष्ट


कविता -- गुलाबाची गोष्ट 

एकदा एका बागेत 
गुलाबांचे रान,
रानामध्ये गुलाबाच्या 
कळ्या होत्या छान. 

कळ्यांना राखीत होते 
टोकदार काटे,
हिरवीगार पाने जणू 
पाळणाच वाटे. 

त्यातच एका कळीला 
झाला अभिमान,
कंटाळून काट्याला म्हणे 
''काढते वर मान'

काटा म्हणे कळीला 
"बाळा जरा जपून,
खुपश्या नजरा 
तुला पाहतात लपून"

कळी म्हणे काट्यास,
"कशी राहू जपून?
सौंदर्याला का ठेवू 
काटयांमध्ये लपून?"

"स्तुती माझी करणारे 
कुणीतरी हवे,
वीट आला रोजच पाहून 
काट्यांचे हे थवे."

असे म्हणून कळीने 
काढले वर डोके, 
बघू आता कोण मला 
कैसे कसे रोके. 

टपोरी ती कळी आता 
उघडयावर आली,
चोहीकडे कळीचीच 
स्तुती सुरू झाली. 

जेव्हा त्या कळीचे 
झाले फुलात रूपांतर,
राखणदार काटयांपासून 
झाले आता अंतर. 

नाईलाज होऊन 
काटा कळीस म्हणाला, 
"कसे करू रक्षण,
आता सांगू मी कुणाला ?"

मग ती वेळ आली, 
होती ज्याची भिती,
काट्यास ठाऊक होती 
माणसाची नीती. 

ठाऊक होते त्याला 
आता जाणार ती सोडून,
नेणार होता कुणीतरी 
गुलाबाला तोडून. 

क्रूर हातांनी जेव्हा 
तोडले त्याचे फुल,
रडला फार काटा 
जसे नवजात मूल. 

पाणावलेल्या डोळ्याने 
जेव्हा पाहिले काट्यास,
फुलासही उमगले 
आले दुःख का वाटयास. 

सुवास त्याचा घेऊन 
जेव्हा कंटाळा आला, 
कोमेजलेले फुल आता 
हवे ते कुणाला ?

एक एक पाकळी तोडून 
केला त्याचा नाश,
लाचार काटा पाहत राहिला 
होऊन हताश. 

असे हे अवेळी 
नसते आले ग मरण,
सौंदर्याचा अभिमान 
बनले हे कारण. 

काटा म्हणे फुलास,
"तरी सांगत होतो बाळा.. 
नको जाऊस दूर असा 
तोडून जिव्हाळा... !

असाच एक राखणदार 
तुमचाही असेल,
तुमच्याच प्रेमात जो 
दिन-रात खपेल. 

नका जाऊ दूर आणि 
नका होऊ नष्ट, 
येतील जेव्हा विचार... 
आठवा गुलाबाची गोष्ट... !

















































































































































अवीट गोडीचे गाणे : वेडात मराठे वीर दौडले सात !

 

  अवीट गोडीचे गाणे : वेडात मराठे वीर दौडले सात ! 

           हे गीत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांवर आधारित आहे. स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार लढून धारातीर्थी पडले. बहलोल खानाच्या ३० हजार फौजेपुढे हे मराठे वीर त्वेषाने लढले. त्यांना उद्देशूनच कवी कुसुमाग्रजांनी हे गीत रचले. लता मंगेशकर यांनी आपल्या सुंदर आवाजात हे गीत गायले. हे गीत ऐकले कि आपलेही बाहू फुरफुरतात. मुठी आवळल्या जातात. सात वीर ३० हजार फौजेसमोर कसे लढले असतील याचा विचार न केलेलाच बरा. या सात वीरांना मृत्यूचे भय अजिबात वाटले नाही. त्यांना फक्त डोळ्यासमोर स्वराज्य दिसत होते. या स्वराज्यासाठीच ते त्वेषाने लढले. 

          प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात घनघोर युध्द झाले. प्रतापरावाने खानाचा पुरता बिमोड केला. खान प्रतापरावाला शरण आला. खानाने तहात 'मला सोडून दयावे, मी मुलखात परत जाईन.' असे म्हणले. युद्धात शरण आलेल्याना मारू नये असे युद्धशास्त्रात सांगितल्याने प्रतापरावाने दया दाखवून खानाला सोडून दिले. बहलोलखान परत येत असल्याची बातमी महाराजांना कळली. महाराज खवळले आणि त्यांनी प्रतापराव गुजरांना खरमरीत पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, 'बहलोलखान सारखा स्वारी करून येत आहे. त्याला संपवल्याखेरीज आम्हाला तोंड न दाखवणे.' हे पत्र हाती पडताच प्रतापराव गुजर बेभान झाला. त्यांनी तलवार हाती घेतली. त्यांच्याबरोबर विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिळदेव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर हे सहा मावळे घेतले. बहलोलखानाचा सूड घेण्यासाठी हे सात मावळे देहभान विसरून बेफाम सुटले होते. वाटेत त्यांना कुणीही अडवू शकत नव्हते इतके ते सुडाने पेटले होते. प्रतापरावाची आणि खानाची नेसरीच्या खिंडीत गाठ पडली. बहलोलखानाच्या फौजेपुढे सात जणांचा कितीसा निभाव लागणार ? बहलोलखानाच्या फौजेवर सात वीर तुटून पडले. शर्थीने लढत होते पण खानाची फौजच इतकी होती कि सात वीरांचे प्रयत्न कमी पडत होते. एक एक मोहरा गळत होता. शेवटी प्रतापराव सुद्धा धारातिर्थी पडला. स्वराज्याचा आणखी एक मोहरा गळाला. नेसरीची खिंड रक्ताने पावन झाली. तो दिवस होता शिवरात्रीचा. प्रतापराव परत तोंड दाखवण्यास येणार नव्हता. 


म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !

कवी : कुसुमाग्रज


तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...