Saturday, September 9, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।


तुकाराम महाराज गाथा - अभंग - नमो विश्वरूपा विष्णुमायबापा ।

नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
   तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥
         तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

 ओवी : नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥

अर्थ : संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या आणि आईबाप असणाऱ्या विष्णूदेवा तू अपार आणि अनंत आहेस. तुला माझे नमन आहे. मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी. 

भावार्थ : विष्णुदेव हा संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. सजीव-निर्जीव, मनुष्य-प्राणी, झाडे-झुडपे, वेली, किडा-मुंगी, पक्षी, दगड-माती तसेच कणाकणात, चराचरात त्याचा वास आहे. सृष्टीचा निर्माता असल्याने सारी सृष्टीच त्याने व्यापलेली आहे. त्यामुळे विष्णुदेव हा अपार आणि अनंत आहे. तसेच विष्णुदेव आपल्या सर्व भक्तांची काळजी वाहणारा आहे. त्याच्या मनात आपल्या भक्तांबद्दल प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य ओसंडून वाहत आहे म्हणूनच तो आपल्या भक्तांचा आईबाप झालेला आहे. अशा विष्णुदेवाला तुकाराम महाराज नमन (नमस्कार) करतात व म्हणतात कि, "मी तुझा रंक सेवक विनंती करीत आहे, माझी एक गोष्ट आपण ऐकावी."

ओवी : तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥

अर्थ : देवा, तुमची स्तुती करण्यात वेद देखील थकला म्हणून 'नेती,नेती' असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, पुष्कळ कविलोक आणि सिध्दपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत.  

भावार्थ : विष्णूचे कितीही गुणवर्णन केले तरी संपत नाहीत. त्याची कीर्ती अगाध आहे. ती वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. ऋषी, मुनींनी ग्रंथातून, पुराणांतून, शास्त्र-उपनिषदातून, श्लोकातून, पोथींमधून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे. सिद्धपुरुषांनी, संत-महंतांनी कीर्तनातून, प्रवचनातून विष्णूचे गुणवर्णन गायले आहे तसेच विष्णूची महती व कीर्ती गायली आहे. वेदांमधूनही विष्णूची स्तुती केलेली आहे तरी ती अपुरीच आहे. 

         विष्णूची कितीही स्तुती केली, त्याचे गुणवर्णन गायले तरी ते अपुरेच आहे. कारण विष्णू हा असा भगवंत आहे तो संकट काळाला धावून येणारा आहे. विविध रूपात येऊन आपल्या भक्तांचे संरक्षण करणारा आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास झाला व अधर्माची वाढ झाली, पापकर्मे वाढू लागली, चांगल्या गोष्टींचा व कर्मांचा नाश होऊन वाईट कर्मे वाढू लागली तेव्हा विष्णूने दशावतार (१. मत्स्य, २. कूर्म, ३. वराह, ४. नरसिंह, ५. वामन, ६. परशुराम, ७. राम, ८. कृष्ण, ९. गौतम बुद्ध, १०. कल्की) धारण करून अधर्माचा व पापकर्माचा नाश केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नरसिंह अवतार. या अवतारात येऊन हिरण्यकश्यपू  सारख्या पापी माणसाचा वध केला. राम अवतारात येऊन अहंकारी रावणाचा वध केला. तर कृष्ण अवतारात येऊन पापी कंसाचा व असुरांचा वध केला तर अधर्माने वागणाऱ्या दुर्योधनाचा व त्याच्या साथीदारांचा पांडवांकरवी वध केला. म्हणजेच साधू-संत, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी व धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी विष्णूने दहा अवतार धारण केले. म्हणूनच विष्णूचे कितीही गुणगान गायले त्याची किर्ती, महती वर्णन केली तरी कमी पडत आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "देवा, तुमची स्तुती करण्यास वेद देखील थकला म्हणून 'नेति नेति' (या संस्कृत वचनाचा अर्थ 'हेही नाही, तेही नाही' असा होतो) असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष हे तुझे गुण जरी वर्णन करीत आहेत तरी ते संपत नाहीत"

ओवी : तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे.

भावार्थ : तुकाराम महाराज म्हणतात, "जिथे विष्णूची स्तुती करण्यास वेद थकला, ऋषी, मुनी, कविलोक आणि सिद्धपुरुष कितीही विष्णूचे गुण वर्णन करीत असले तरी त्यांचे शब्द अपुरे पडत आहेत तिथे तुमची किर्ती वर्णन केली जाईल, अशी माझी वाचा कसली आली आहे? म्हणजेच तुमची किर्ती वर्णन करण्याइतकी व तुमची महती गाण्याइतके शब्द माझ्याकडे नाहीत."



 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, September 8, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥

  वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ।।१।।
       करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ।।२।।
दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ।।३।।
तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळ ।।४।। 

ओवी : वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ।।१।। करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ।।२।।

अर्थ : विठ्ठलाचे सेवक हे मोठे शूर आहेत, म्हणून काळ त्यांच्या पाया पडतो. ते निरंतर विठ्ठलनामाच्या जयजयकाराचा घोष करितात, त्या योगाने मोठमोठे पापांचे डोंगरही जळून जातात. 

भावार्थ : विठ्ठलाचे सेवक (भक्त) सतत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असतात. भजन-कीर्तनात दंग असतात. त्यांचे मुखातून 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग-पांडुरंग' असा विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. विठ्ठलावर त्यांची अपार श्रद्धा असते. त्यांनी विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थान दिलेले असते. तसेच ते विठ्ठलाशी एकरूप झालेले असतात. विठ्ठलही आपल्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. त्यांच्या अडीअडचणीला धावून येतो. भक्तांवर आलेली संकटे स्वतः झेलतो तसेच संकटांचे निवारण करतो. म्हणूनच विठ्ठलाचे भक्त हे निर्धास्त असतात. विठ्ठल पाठीराखा असल्याने विठ्ठलभक्त कुणालाही घाबरत नाहीत अगदी काळालासुद्धा. विठ्ठलामुळे काळच त्यांच्याजवळ यायला घाबरतो तसेच त्यांच्या पाया पडतो. विठ्ठलनामात फार मोठी ताकत आहे. सतत विठ्ठलाचे नाम घेतल्याने (जयजयकाराचा घोष केल्याने) मन पवित्र, निर्मळ होते. मनात असलेले वाईट विचार निघून जातात. हातून घडलेल्या पापांचे क्षालन होते. म्हणूनच विठ्ठलभक्त सतत विठ्ठलनामाच्या जयजयकाराचा घोष करतात त्यायोगाने त्यांचे हातून घडलेल्या पापांचे क्षालन होते.(पापांचे डोंगर जळून जातात.) 

ओवी : दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ।।३।। तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ।।४।।

अर्थ : त्या वीरांच्या हातामध्ये दया क्षमा शांति हे न तुटणारे बाण आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या भूमंडळामध्ये तेच एक बलाढय आहेत. 

भावार्थ : विठ्ठलाचे भक्त हे मनाने प्रेमळ असतात. ते सहसा कुणावर क्रोधीत होत नाहीत. त्यांच्याविषयी कुणी अपशब्द वापरले अथवा त्यांची निंदानालस्ती केली तरी ते करणाऱ्यावर चिडत नाहीत. शांतचित्ताने सर्व ऐकून घेतात व करणाऱ्याला चार चांगल्या उपदेशपर गोष्टी सांगतात. त्यांच्या प्रेमळ व शांत स्वभावामुळे ते रंजल्या-गांजलेल्याना, दीन-दुबळ्या, गरीबांना आपलेसे करतात. त्यांना पाहिजे ती मदत करतात. अशा लोकांवर ते प्रेम करतात. जर एखादा वाईट मार्गाने जात असेल, वाईट विचाराने वागत असेल तर अशा माणसाला विठ्ठलभक्त क्षमा करतात व त्याला दुष्कृत्य करण्यापासून रोखतात तसेच चांगल्या मार्गावरून चालण्यास व विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करतात. दया क्षमा शांति या त्रिसूत्रीनुसार त्यांचे आचार विचार असतात. 'दया क्षमा शांति, तेथे देवाची वस्ती' या उक्तीनुसार त्यांचेजवळ देवाची वस्ती आहे. त्यामुळे संकटे, अडचणी, दुःख त्यांचेपासून लांब राहतात. देवच त्यांचा पाठीराखा असल्याने ते बलाढय आहेत. ते कुणाला घाबरत नाहीत. म्हणूनचं तुकाराम महाराज म्हणतात कि, "त्या वीरांच्या (विठ्ठल भक्तांच्या) हातामध्ये दया क्षमा शांति हे न तुटणारे बाण आहेत म्हणूनच ते ह्या भूमंडळामध्ये (पृथ्वीमध्ये) बलाढय आहेत."

 

 

 

 

 

 

 

   

 

 

 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 


तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...