Saturday, December 26, 2020

तुकाराम महाराज अभंग -- मैंद आला पंढरीस ।


तुकाराम महाराज अभंग -- मैंद आला पंढरीस ।

 

मैंद आला पंढरीस । हाती घेऊनि प्रेमपाश ।। १ ।।

पुढे नाडियले जग । नेतो लागों नेदी माग ।। २ ।।

उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधिताहे ।। ३ ।। 

वैकुंठीहूनि पेणें ।  केलें पंढरीकारणे ।। ४ ।।

पुंडलिकें थारा । देऊनि आणिलें या चोरा ।। ५ ।।

तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ।। ६ ।। 

          पांडुरंग हा लबाड चोर आहे कारण तो भक्तांवर प्रेमाचे पाश टाकतो. भक्तसुद्धा त्याच्या प्रेमाच्या पाशात अडकतात म्हणजेच आपले घर संसार सोडून पांडुरंगाच्या प्रेमात पडतात. त्याची भक्ती करू लागतात. पांडुरंग आपल्या भक्तांना नादी लावतो, त्यांना वेडे करतो. भक्तांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करतो. भक्तही पांडुरंगासाठी वेडे होतात. भक्तीपोटी, प्रेमापोटी पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जातात. पांडुरंग पंढरीमध्ये आपल्या भक्तांची वाट बघत कटीवर हात ठेवून उभा राहिलेला असतो. जे भक्त त्याला भेटायला जातील त्या भक्तांना ज्या ठिकाणचा काही मागमूसही लागत नाही त्याठिकाणी घेऊन जातो म्हणजेच वैकुंठात घेऊन जातो. 

          पांडुरंग आपले बाहू (हात ) वर करून आपल्या भक्तांकडे प्रेमाने बघत असतो. आपल्या भक्तांना प्रेमाने मिठी मारायला बघत असतो. पांडुरंगाने आपल्या भक्तांच्या डोळ्यात डोळे मिसळवले म्हणजेच भक्तांच्या डोळ्यात प्रेमाने बघितले कि भक्ताला पांडुरंगाच्या डोळ्यात आपल्याबद्दलचे प्रेम दिसते. पांडुरंगाचे आपल्याबद्दलचे प्रेम बघून भक्त मनोमन सुखावतो. त्याला पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागते. कधी एकदा पांडुरंगाला भेटतो व प्रेमाने मिठी मारतो असे भक्ताला होते. पांडुरंगच आपल्या भक्तांना प्रेमाने मिठीत घेण्यासाठी दोन्ही बाहू वर करून उभा आहे व भक्तांकडे प्रेमाने बघत आहे व आपल्या भेटीसाठी भक्तांना वेध लावीत आहे. 

          आपल्या भक्तांना भेटता यावे, त्यांना प्रेमाने मिठीत घेता यावे यासाठी पांडुरंगाने वैकुंठातून येऊन पंढरीस मुक्काम केला आहे. याचाच अर्थ त्याचे आपल्या भक्तांवर अतोनात प्रेम आहे. अंतःकरणापासून भक्ती करणारे भक्त पांडुरंगाला आवडतात. या भक्तांवर पांडुरंग मनापासून प्रेम करतो, त्यांना फुलासारखे जपतो. त्यांना भेटता यावे, त्यांचा सहवास घडावा यासाठी पांडुरंगाने वैकुंठ सोडले व पंढरीस येऊन मुक्काम केला आहे. 

          विठ्ठल पुंडलिकाची भक्ती बघून त्याला भेटण्यासाठी पंढरपुरात आला. विठ्ठल पंढरपुरात आल्यावर त्याला काय दृश्य दिसले तर आपला आवडता भक्त आई वडिलांच्या सेवेत मग्न आहे. विठ्ठलाने पुंडलिकाला हाक मारली व सांगितले, "मी आलो आहे तुला भेटायला." पुंडलिकाने विठ्ठलाकडे बघितले व म्हणाला, "मी आई वडिलांची करीत आहे. ती सेवा होईपर्यंत मला उठता येणार नाही. माझी सेवा होईपर्यंत तुला थांबावे लागेल." असे म्हणून पुंडलिकाने विठ्ठलाच्या दिशेने एक वीट भिरकावली. विठ्ठल विटेवर उभा राहून पुंडलिकाची सेवा संपण्याची वाट बघत आहे. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा बघून विठ्ठल भारावला. 

          तुकाराम महाराज म्हणतात, चोराला पुंडलिकाने आणून आधार दिला आहे. म्हणजेच विठ्ठल स्वतः पुंडलिकाच्या भक्तीवर भाळून वैकुंठ सोडून पृथ्वीतलावर आला. पुंडलिकाने आपल्या भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला पृथ्वीतलावर आणले व त्याला पंढरीस स्थान दिले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही जाऊ व त्याला धरू. म्हणजेच भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला आपलेसे करू. त्याच्या हृदयात स्थान मिळवू. त्याचे प्रेम, माया मिळवू.









 

 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sunday, December 13, 2020

बोधकथा -- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ


बोधकथा -- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ 
 
            एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर कावळ्याचे एक जोडपे घरटयात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप राहत होता. हा साप कावळ्याची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी. दरवेळी असे झाल्याने कावळा कावळी खूप दुःखी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा राहत होता. कावळ्याने त्याची भेट घेतली. सापाचा बंदोबस्त करण्यासाठी मदत मागितली. 
               कोल्ह्याने बराच विचार केला. त्याला एक युक्ती सुचली ती त्याने कावळ्याला सांगितली. एखादया श्रीमंत घराण्यात जाऊन मौल्यवान दागिना घेऊन ये व सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे ते तुझा पाठलाग करतीलच, प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू घेऊन जातील. कावळ्याला हा उपाय एकदम पटला. 
           कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावर काढून ठेवले होते. कावळ्याने त्यातला एक मौल्यवान हार उचलला व उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते. 
               कावळ्याने तो हार  बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई त्या बिळाजवळ आले व बीळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले व हार घेऊन निघून गेले. कावळा व कावळीची चिंता कायमची दूर झाल्याने ते आनंदी झाले व त्यांनी कोल्ह्याचे आभार मानले. अशा तऱ्हेने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली.
               









 
 
 
 
 
 
 
 
 

Saturday, December 12, 2020

बोधकथा -- सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्याच्या पुरस्कार

 बोधकथा -- सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्याच्या पुरस्कार 

           एकदा सम्राट अशोकाने सर्वश्रेष्ठ शासकाला म्हणजेच राज्यकर्त्याला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या सर्व राज्यांच्या शासकांना निमंत्रण पाठवले. सारे शासक ठरल्यावेळी दरबारात हजर झाले. अशोकाने त्यांना त्यांच्या कामगिरीविषयी विचारले. 

          एक शासक म्हणाला कि, त्याच्या शासनकाळात राज्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. दुसऱ्या शासकाने सांगितले कि, त्याच्या काळात सुवर्णमुद्रांचे भांडार स्थापन केले आहे. तिसऱ्याने सांगितले कि, त्याने आधुनिक शस्त्रांची निर्मिती केली आहे. सर्वांनी आपली कामगिरी सांगितली. 

          शेवटी एक शासक पडत्या स्वरात म्हणाला, ना मी राज्याचा खजिना सुवर्णमुद्रांनी भरू शकलो ना उत्पन्न दुप्पट करू शकलो तसेच मी आधुनिक शस्त्रांची निर्मितीही केली नाही. उलट माझ्या शासन काळात राज्याचा खजिना कमी झाला आहे. मी खजिन्यातील धन शाळा आणि रुग्णालये उभारण्यासाठी खर्च केला आहे. माझ्या राज्यात वृक्ष लावण्यासाठी मी खूप खर्च केला आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्याचाही प्रयत्न केला आहे. यामुळे प्रजा आनंदी आहे. याशिवाय मी कोणतीही कामगिरी केली नाही. 

          सम्राट अशोकाने त्याला विजयी घोषित केले व सांगितले, "खरे तर तूच खरा सर्वश्रेष्ठ शासक आहे. प्रजेला सुखी बनवणे व त्यांना उपजीविकेची साधने मिळवून देणे हेच प्रत्येक शासकाचे कर्त्यव्य असते. बाकीच्या शासकांनी राज्यसत्ता बळकट होईल ते सारे मिळवण्याचा प्रयत्न केला व प्रजा कमकुवत केली हे मला मंजूर नाही. तू माझा आदर्श आत्मसात केला याचा मला आनंद वाटतो. इतर शासकांनीही या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे." हे ऐकून इतर शासकांनी लाजेने आपल्या माना झुकवल्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 











तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...