Saturday, June 10, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।।

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।।

 

 बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।। १ ।।

     जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ।। २ ।।

जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ।। ३ ।।

तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ।। ४ ।।

ओवी : बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।। १ ।। जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ।। २ ।।

अर्थ : जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये. अहो गोविंदा, तुम्हाला विसरून ज्याचेकडून संतांची निंदा झाली आहे. 

भावार्थ : तुकाराम महाराजांनी या अभंगात असे म्हणले आहे कि, जो कोणी गोविंदाला (पांडुरंगाला) विसरून, त्याची भक्ती करायची सोडून वाईट मार्गाने जात आहेत. तसेच संतांबद्दल अपशब्द बोलून त्यांची निंदा करत आहेत. त्यांची वचने, चांगले विचार ऐकत नाहीत तसेच त्यांना संतांचा सहवास आवडत नाही अशा दुर्जन माणसांशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये कारण दुर्जन माणसांच्या सहवासात आल्यावर व त्यांच्याशी बोलल्यावर ते जसे संतांची निंदा करतात व त्यांचे तोंडातून संतांबद्दल अपशब्द बाहेर पडतात तसेच आपल्याही तोंडातून संतांबद्दल अपशब्द बाहेर पडतील व त्यांची निंदा केली जाईल म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, 'जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये.'  

ओवी : जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ।। ३ ।। तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ।। ४ ।।

अर्थ : त्याचे तोंडाला आग लागो. असला तो भांडखोर माझे दृष्टीपुढेसुद्धा नको. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, असल्या दुर्जनापासून मला दूर ठेवा.  

भावार्थ : जे संतांची निंदा करतात, सतत भांडतात तसेच त्यांच्या तोंडातून अपशब्द म्हणजेच शिव्याशाप बाहेर पडतात अशा लोकांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात कि, 'त्याचे तोंडाला आग लागो. अशा लोकांचे तोंडसुद्धा मला पाहण्याची इच्छा नाही. असला तो भांडखोर माझे दृष्टीपुढेसुद्धा नको.' तुकाराम महाराज देवाला विनवणी करताना म्हणतात कि, जे संतांची निंदा करतात व तुझे नामस्मरण घेत नाहीत व तुझी भक्ती करत नाहीत अशा माणसांपासून मला दूर ठेवा. त्यांचा सहवास मला नको कारण त्यांचे सहवासाने मी तुमची भक्ती करायची विसरून व संतांची वचने, चांगले विचार ऐकायचे सोडून त्यांचेप्रमाणेच संतांची निंदा नालस्ती करीन व सतत भांडत राहीन.

 

 

 

 

 

 

 

 

कविता - पंढरीची वारी

 

कविता - पंढरीची वारी 

 

पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी,

आणि म्हणाला, 'आवर लवकर बयो, निघालेत वारकरी, ।

मी म्हणाले, 'निघते हं विठू, घरचं एकदा बघते,

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते ।

लगबग माझी सुरु झाली,

नवऱ्याचे कपडे बघू कि 

मुलांसाठी खाऊ करू,

एवढया कमी अवधीत 

सगळं कसं आवरू ।

शेवटी एकदाची तयार झाले,

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

काळजातली गलबल लपवु पाहत होते,

डोळ्यांमधले अश्रू थोपवू पाहत होते ।

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी,

मीच मला समजावत होते परोपरी ।

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असू दे, बघु पुढे केव्हांतरी ।

माझा एक पाय आत, एक पाय बाहेर,

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना, 

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना ।

मी म्हणाले, 'सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं,

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।

उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी,

तूच आता काहीतरी दे बाबा हमी ।

कुणी म्हणत ममत्व सोड,

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे,

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे ।

एकच भीती वाटते विठु, 

प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक 

तुटून जाईल ही श्वासाची दोरी,

आणि कधीच घडणार नाही रे 

तुझ्या पंढरपूरची वारी ।

माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले, 

त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले ।

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, 

'संसार सोडू नकोस एक फक्त कर,

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव,

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।

इंद्रियांना  करू देत त्यांचं काम,

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही, 

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही ।

तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी,

त्याचीच असुदे तुझ्यावर सत्ता, मग बघ 

मन, बुद्धी, चित्त, अहंकार 

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता । 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल,

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।

अहंकार गेला कि ममत्वही सुटेल,

रज-तमाच कवाड एक एक करून मिटेल ।

हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश,

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।

निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल,

आणि विश्वास ठेव पोरी,

पैलतीरावर हात देण्यासाठी,

चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी,

चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।


















 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 









तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...