Sunday, June 13, 2021

अवीट गोडीचे गाणे -- कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

 अवीट गोडीचे गाणे -- कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

          "कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम" हे भक्तीगीत देव पावला या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला. हे गाणे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले असून माणिक वर्मा यांनी गायले आहे. पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गीत सुलोचना यांचेवर चित्रित झालेले आहे. 

          या गीतात देव आणि भक्त यांचे नाते सांगितले आहे. देव आपल्या भाबडया भक्तासाठी काहीही काम करायला तयार असतो. देव फक्त भक्ताची भाबडी भक्ती बघतो. या गीतातसुद्धा राम आपला भाबडा भक्त कबीर याला शेले विणायला मदत करत असतो. कबीराला हे माहीतच नसते. तो आपला रामनामात दंग असतो. कबीर रामनामाचे गीत गात असतो तर इकडे कौसल्येचा राम एकेक धागा गुंतत जातो. शेवटी रघुनंदन सर्व शेला विणून पूर्ण करतो व गुप्त होतो. कबीर जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला दिसते कि सर्व शेला रघुवीरने विणला आहे. कबीर धन्य होतो व रामाला वंदन करतो. 

          हे भक्तीगीत कानांना ऐकायला किती गोड वाटते. हे गाणे ऐकले कि मनात भक्तीभाव जागृत होतो व आपोआप डोळ्यासमोर राम उभा राहतो व रामाला हात जोडले जातात.  ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या ह्या अवीट गोडीच्या गाण्याचे माणिक वर्मा यांनी आपल्या सुरेल आवाजात गावून सोने केले आहे. 

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ
राजा घनश्याम

दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
गुप्त होई राम

हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम  


 

Saturday, June 12, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।।

 तुकाराम महाराज गाथा 

 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।।

 भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।। १ ।।

शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ।। २ ।।

देवाविण भक्ता । कोण देतां निष्कामता ।। ३ ।।

तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ।। ४ ।।

ओवी : भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।। १ ।। शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ।। २ ।।

अर्थ : भक्ताखेरीज देवाला साकारत्व कसे येईल व भक्तावाचून त्याची सेवा तरी कोणी करील ? जसे सोन्याची आंगठी आणि त्यातील हिऱ्याचे कोंदण हि एकमेकांच्या योगाने सुशोभित आहेत, तसे देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत. 

भावार्थ : या अभंगात तुकाराम महाराजांनी देव आणि भक्ताचे नाते सांगितले आहे. भक्ताने जर देवाची अंतःकरणापासून भक्ती केली, त्याची सेवा केली तरच त्याला देवपण (साकारत्व) येईल, नाहीतर देव म्हणजे नुसता दगड होऊन बसेल. आपण दगडालाही देव मानतो, त्याची पुजाअर्चा करतो म्हणूनच दगडातही देव साकारतो व त्या दगडाचीही सेवा केली जाते. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात कि, भक्ताखेरीज देवाला साकारत्व (देवपण) येणार नाही व भक्तच त्याची सेवा करेल. देव आणि भक्त दोघेही एकच आहे. देवाला भक्ताने केलेली भक्ती, सेवा मनापासून आवडते व भक्ताला देवाची भक्ती करायला, त्याचे नामःस्मरण घ्यायला मनापासून आवडते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा हि संतमंडळी पांडुरंगाचे सतत नामःस्मरण घ्यायचे. त्याच्या भक्तीतच रंगून जायचे. त्यांना सगळीकडे पांडुरंग दिसायचा. त्यांच्या हृदयातच पांडुरंग होता. एवढी त्यांची पांडुरंगावर दृढ श्रद्धा, भक्ती होती. पांडुरंगसुद्धा त्यांना संकटात मदत करायचा. त्यांच्या हाकेला ओ द्यायचा. संत तुकाराम महाराजांनीही पांडुरंगाची भक्ती, सेवा केली. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत आणि यासाठी त्यांनी सोन्याची आंगठी आणि हिऱ्याचे उदाहरण दिले आहे. जसे सोन्याची आंगठी व त्यात बसविलेला हिरा यामुळे दोघांनाही शोभा येते तसेच देव आणि भक्त हे परस्परांच्या योगामुळे शोभिवंत होतात. 

 ओवी : देवाविण भक्ता । कोण देतां निष्कामता ।। ३ ।। तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ।। ४ ।।

अर्थ : देवाखेरीज भक्ताला निष्कामपद देणारा कोण आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, जसा मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध आहे. ह्या दृष्टांताचा संबंध ध्रुव पदाशी आहे. 

भावार्थ : भक्ताने देवाची अंतःकरणापासून व निस्वार्थभावनेने भक्ती, सेवा केल्यावर देव त्याला अशा ठिकाणी नेवून बसवतो कि तेथे मोह, माया, मत्सर, क्रोध, अहंकार, वासना या अवगुणांना थारा नाही. हे निष्कामपद म्हणजेच निरपेक्ष, निरासक्त, निर्मोही, वासनारहित पद देवाशिवाय भक्ताला कोणी देऊ शकत नाही. देव आणि भक्तात एवढे पवित्र नाते निर्माण झालेले असते कि, देवाला आपल्या भक्ताबाबत वात्सल्य, माया निर्माण झालेली असते. थोडक्यात देव भक्ताची माऊली झालेली असते. भक्त व देव यांचे नाते आई आणि मुलगा या पवित्र नात्यापेक्षाही उच्चं कोटीचे नाते निर्माण झालेले असते व या नात्याचा संबंध ध्रुव पदापर्यंत म्हणजेच अढळ स्थानापर्यंत पोचतो. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 












 

Friday, June 11, 2021

क्रिकेटचा कर्नल -- दिलीप वेंगसरकर

 क्रिकेटचा कर्नल -- दिलीप वेंगसरकर 

          ७ जून १९८६ रोजी म्हणजे बरोबर ३५ वर्षांपूर्वी लॉर्डसच्या मैदानावर एक इतिहास घडला तो म्हणजे लागोपाठ तीन शतके ठोकण्याचा विक्रम. हा विक्रम रचणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणजे दिलीप वेंगसरकर. 

          ३५ वर्षांपूर्वीचा काळ कसोटी क्रिकेटचा काळ होता. तेव्हा तंत्रशुद्ध व कलात्मक खेळाला महत्व होतं. जे फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजी करायचे त्यांना क्रिकेट जगतात आदर दिला जायचा. सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ हे आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने क्रिकेट जगतात मानाचे स्थान पटकावून बसले होते. या यादीत आणखी एका खेळाडूचे नाव घेता येईल ते म्हणजे दिलीप बळवंत वेंगसरकर उर्फ 'कर्नल वेंगसरकर'. मुंबईचा हा उंचपुरा खेळाडू आपल्या कलात्मक व फलंदाजीतील नजाकतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचा. तो फलंदाजीला आला कि प्रेक्षकांना एक बहारदार खेळ पाहायला मिळायचा. त्याच्या खेळीत स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राइव्ह, हुक, पूल या सर्व फटक्यांचा समावेश असायचा. स्क्वेअर कटवर तर त्याची हुकूमत असायची. या फटक्याने चेंडू कधी सीमापार व्हायचा ते क्षेत्ररक्षकाला देखील कळायचे नाही. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. दडपणाखाली तर त्याचा खेळ आणखी बहरायचा. मितभाषी, कुठल्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकणारा व प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. 

          दिलीप वेंगसरकारने ७ जून १९८६ रोजी म्हणजे बरोबर ३५ वर्षांपूर्वी एक इतिहास घडवला तो म्हणजे लॉर्डसवर लागोपाठ तीन शतके ठोकण्याचा विक्रम. या आधीही त्याने १९७९ आणि १९८२ साली शतके ठोकली होती. इंग्लंडमधील लॉर्डसला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. या मैदानावर शतक ठोकण्याचे प्रत्येक खळाडूंचे स्वप्न असते. बिनीचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग यांना अजूनही हि कामगिरी करता आलेली नाही. परंतु वेंगसरकरने तब्बल तीन वेळा शतक झळकावून हा इतिहास रचला आहे. अशी दैदिप्यमान कामगिरी करणारा पहिला भारतीय व आशियायी खेळाडू म्हणून त्याचा मान आहे. तर जगातील अशी कामगिरी करणारा तो सहावा खेळाडू आहे. याआधी सर जॅक हॉब्स, सर लेन हटन, डेनिस कॉम्प्टन, जॉन एड्रीच आणि जेफ्री बॉयकॉट यांनी लॉर्डसवर तीन शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. हे सर्व महान फलंदाज होते आणि यांच्या पंक्तीत दिलीप वेंगसरकर बसला आहे. यावरूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते व या गुणवत्तेमुळेच त्याच्या तीन शतकांचा समावेश विस्डेनच्या यादीत करण्यात आला आहे. 

          त्याच्या या लॉर्ड्सवरील खेळीने सामन्याला महत्व प्राप्त झाले होते. या खेळीत त्याने नाबाद १२६ धावा झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. त्याची हि खेळी संपूर्ण तंत्रशुद्ध व कलात्मक होती. या त्याच्या खेळीमुळेच त्याला कर्नल हि पदवी देण्यात आली व त्याचा गौरव केला गेला. त्याची हि खेळी पाहणारे खरोखरच भाग्यवान होते. 














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...