Friday, November 10, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - हाकेसरशी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥

 



 तुकाराम महाराज गाथा - अभंग - हाकेसरशी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥


हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

ओवी :  हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥

अर्थ : प्रल्हादाने नारायण नामाने हाक मारल्याबरोबर देव त्याजकरिता धाव घेवून खांब फोडून प्रगट झाले. अशी कृपावंत माझ्या विठाई माऊलीवाचून कोण आहे ?

भावार्थ : प्रल्हाद हा राजा हिरण्यकश्यपू याचा मुलगा होता. प्रल्हादाची भगवान विष्णूवर अतोनात भक्ती होती. तो सतत विष्णूच्या नामःस्मरणात तल्लीन असायचा त्याचे मुखातून 'नारायण-नारायण' हे शब्द बाहेर पडायचे. त्याची हि भक्ती हिरण्यकश्यपूला आवडायची नाही. प्रल्हादाची भक्ती तुटण्यासाठी हिरण्यकश्यपू त्याचा हर प्रकारे छळ करायचा. कधी त्याला चाबकाचे फटके द्यायचा, त्याच्यावर गरम तेल ओतायचा. अशी त्याला शिक्षा द्यायचा. हि शिक्षा होऊनही प्रल्हादाची भक्ती तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली. प्रल्हादाची वाढत चाललेली भक्ती बघून हिरण्यकश्यपूला आणखी राग यायला लागला. त्याने प्रल्हादाला विचारले, "तु एवढा नारायण-नारायण करतोस तर कुठे आहे तुझा नारायण?" प्रल्हाद म्हणाला, "नारायण चराचरात आहे, कणाकणात आहे, आकाशी आहे पाताळी आहे, सजीवात आहे निर्जीवात आहे, त्याने सर्व विश्व व्यापले आहे. तो सर्वेश्व, विश्वात्मा आहे." हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याने एका खांबाकडे बोट दाखवून प्रल्हादाला विचारले कि, "ह्या खांबात तुझा नारायण असेल तर दाखव मला." असे म्हणून हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली. प्रल्हादाने नारायणाचा धावा करायला सुरवात केली. त्याची हाक ऐकून नारायण नरसिंहाच्या रूपात खांब तोडून प्रकट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. 

          नारायणाने जसे नरसिहांचे रूप घेऊन प्रल्हादाला संकटातून सोडवले तसेच नारायण तसेच नारायण विठ्ठलाचे रूप घेऊन सर्व संतांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरला. त्याने सर्व संतांना संकटातून मुक्त केले. त्यांच्यावरील सर्व दुःखे स्वतः झेलली व त्यांना सुख प्राप्त करून दिले. अशी हि कृपावंत विठाई माउली म्हणजेच प्रल्हादाला संकटातून सोडवणारे नारायणाचे रूप आहे. 

ओवी :  करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

अर्थ : तिचा आठव केल्याबरोबर मोठ्या प्रेमाने धाव घेवून ती आठव करणारास मिठी घालते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते. 

भावार्थ : विठाई माऊली हि आपल्या भक्तांबाबत प्रेमळ आहे, कृपावंत आहे. आपल्या भक्ताने अंतःकरणापासून केलेली भक्ती विठाई माऊलीला आवडते. आई जसे आपल्या मुलावर माया करते, प्रेम करते तसेच विठ्ठल आपल्या भक्तांची आई बनून, माऊली बनून भक्तांना लेकरासमान मानून त्यांच्यावर प्रेम करते, माया लावते. विठ्ठलाचे व भक्ताचे नाते वात्सल्याचे आहे. भक्तसुद्धा विठ्ठलाला आपल्या माऊलीसमान मानतो. मुलगा कसा 'आई-आई' म्हणून आठवण काढतो व आईसुद्धा आपल्या मुलाकडे धाव घेते व मुलाला प्रेमाने मिठीत घेते तसेच विठाई माऊलीचा आठव केल्याबरोबर म्हणजेच विठ्ठलाचे नामःस्मरण केल्याबरोबर विठ्ठल धावत येतो व आपल्या भक्ताला प्रेमाने मिठी मारतो. 

          तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते. विठ्ठलाचे नाम हे गोड असून पवित्र, निर्मळ आहे. या नामात दडली आहे प्रसन्नता, सात्विकता. म्हणूनच जो हरीचे(विठ्ठलाचे) नाव घेईल त्याला जीवनात सुख, शांती प्राप्त होईल. जगातील परमोच्च आनंद प्राप्त होईल. मनुष्याने जर नित्यनियमाने हरीचे(विठ्ठलाचे) नामःस्मरण केले तर त्याला देवाजवळ जाता येते. विठ्ठलालाही आपले नामःस्मरण केलेले आवडते. जो कोणी भक्त नित्यनियमाने विठ्ठलाचे गुणगान गात असेल, त्याचे नामःस्मरण घेत असेल त्याच्यावर विठ्ठल प्रसन्न होतो व त्याला संसारचक्रातून सोडवतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो व मोक्षपदाला नेतो. विठ्ठल त्याला सायुज्यता मिळवून देतो.

 

 

 

 

 

 

 

 

 










 

 

 

 

 

 

 

 

 

Thursday, November 9, 2023

अवीट गोडीचे गाणे - मैने कहा फूलों से, हँसो तो वो खिल खिला के हंस दिए (चित्रपट - मिली)

 



अवीट गोडीचे गाणे -  मैने कहा फूलों से, हँसो तो वो खिल खिला के हंस दिए (चित्रपट - मिली)

         "मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए" हे अवीट गोडीचे गाणे मिली या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता एन सी सिप्पी व हृषीकेश मुखर्जी असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटातील गाणी योगेश यांनी लिहिली असून एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार यांनी गायली असून मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए हे एकमेव गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे. या चित्रपटात जया भादुरी, अमिताभ बच्चन, अशोक कुमार, अरुणा इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

            "मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए" हे अवीट गोडीचे गाणे जया भादुरी यांच्यावर चित्रित झाले असून लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. हे गीत कानाला फारच मोहक वाटते व परत परत ऐकावेसे वाटते.


मैने कहा फूलों से
हँसो तो वो खिल खिला के हंस दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई हँसने के लिए

हो मैने कहा फूलों से
हँसो तो वो खिल खिला के हंस दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई हँसने के लिए
हँसने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)

सूरज हसा तो बिखर बिखर गयी किरणें
सूरज हसा तो बिखर बिखर गयी किरणें
सूरज हंसा रे
किरण किरण चुन कर धरती ये
सज के सुनेहरी बन गयी रे
मैने कहा
ओ मैने कहा सपमों से
सजो तो वो मुस्कुरा के सज गये
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई सजने के लिए
सजने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)

ये शाम तो यूँ हँसी जैसे हँसी दुल्हन

ये शाम तो यूँ हँसी जैसे हँसी दुल्हन
ये शाम तो नीले नीले सांवले अंबर में
रंग जो गुलाबी लगे भरने
मैने कहा
ओ मैने कहा रंगों से
छलको तो वो जग ये सारा रंग गये
और ये कहा जीवन है

भाई मेरे भाई रंगने के लिए
रंगने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)

मौसम मिला वो कहीं एक दिन मुझको
मौसम मिला वो कहीं एक दिन मुझको
मौसम मिला रे
मैने कहा रूको खेलो मेरे संग तुम
मौसम भला रुका जो वो हो गया गुम
मैने कहा

ओ मैने कहा अपनों से चलो तो वो
साथ मेरे चल दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई चलने के लिए
चलने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)
 

 

 

Wednesday, November 8, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं । ताकाचे उपकार तरी करा ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं ।

नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥

ओवी : नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
         नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥

अर्थ :  अहो, तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या). तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा.

भावार्थ : काही लोक दानधर्म करण्याबाबत आपला हात आकडता घेतात. आपल्याकडे आहे त्यातील थोडे का होईना गरजुंना, गरिबांना, दीन-दुबळ्यांना द्यावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. या लोकांना जर दिले तर आपल्याकडे आहे ते संपेल असे या लोकांना वाटते. पण देणारा (देव) तर वर बसला आहे.   तो सढळ हाताने देत असतो. काही कमी पडू देत नाही. म्हणून आपण शक्यतो तितकी मदत गरजूना, अडलेल्याना करावी. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या)." तसेच तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा" म्हणजेच काही लोकांना द्यायची दानत नसते तसेच दुसऱ्यांना देण्याबाबत त्यांचा हात आकडता असतो अशा लोकांना उद्देशून  तुकाराम महाराज म्हणतात. खरे तर पाणी हे जीवन आहे. एकवेळ अन्नावाचून माणूस जगू शकेल परंतु पाणी मिळाले नाही तर माणूस तडफडून मरेल. माणूस पाण्याच्या शोधात लांब लांब भटकत असतो. जिथे पाण्याचा ठिपूस नसतो तिथल्या लोकांचे हाल होतात. एखाद्याला तहान लागली आणि त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासावीस होतो. म्हणूनच पाणी हे जीवन आहे व आपण दुसऱ्याला पाणी पाजतो म्हणजेच त्याला आपण जीवनच देत असतो. खरे तर आपल्या हातून सत्कर्म घडत असते. पुण्य प्राप्त होत असते. तहानलेल्या माणसाला पाण्याचा एक थेंब जरी मिळाला तरी त्याचा आत्मा शांत होतो. तो आपल्याला चांगला आशिर्वाद देतो. चांगला आशिर्वाद मिळणे हीच खरी फलप्राती होय. 

ओवी :  तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'

भावार्थ : तुकाराम महाराजांना हरीचे सगुणरूप बघण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचा जीव तळमळत आहे. तुकाराम महाराजांनी हरीची एवढी भक्ती केली कि त्यांना हरीच्या सगुणरूपाच्या दर्शनाची आस(ओढ) लागली आहे. कधी एकदा हरीचे सावळे, सुंदर, मनोहारी  रूप डोळ्यात साठवतो असे त्यांना झाले आहे. म्हणूनच ते संत-सज्जन लोकांना विनवणी(विनंती) करितात कि, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'







तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।



तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।

 

धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

ओवी :  धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण । वाहों चिंता दासांसी ॥१॥
             सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥ध्रु.॥

अर्थ : परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो व आपले जे सेवक आहेत त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही. आपण मात्र आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करिते. 

भावार्थ : जे भक्त चिकाटीने परमार्थ करतात, त्यात खंड पडू देत नाहीत. परमार्थ करतात म्हणजेच मनात कुठलीच आशा, लोभ, मोह याचा विचार न करता निःस्वार्थ भावनेने सेवा करतात, सत्कर्म करतात, चांगली कार्ये करतात व हि कार्ये, सत्कर्म त्यांचे हातून नियमित घडत असतात. हि कार्ये, सत्कर्म साधू-संत, सज्जन ह्या लोकांकडून होत असतात. ह्या लोकांनाच नारायण साह्य होतो, ह्या लोकांच्या पाठीमागे उभा राहतो. त्यांना हवी ती मदत करतो. त्यांचा सर्व भार आपल्या शिरावर घेतो. त्यांना कुठलेही श्रम पडू देत नाही कि चिंता करू देत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि,"परमार्थाविषयी धीर धरल्याने नारायण साह्य होतो व आपले जे सेवक(भक्त) आहेत त्यांना श्रम पडू देत नाही आणि चिंताही करू देत नाही."

          परमार्थ केल्याने नारायण साह्य होतो व आपल्या भक्तांना कुठलेही श्रम पडू देत कि त्यांच्यावर कुठलेही संकट येऊ देत नाही. आलेल्या संकटाचे लगेच निवारण करतो. तो भक्तांची काळजी वाहतो.   म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि,"हरीचे आनंदाने कीर्तन करावे, हरीचे गुण गावे म्हणजे त्या योगाने देवाचे सुदर्शन आपल्या आपण काळाचे निवारण करिते." म्हणजेच हरीचे आनंदाने कीर्तन केल्याने व त्याचे गुण गायल्याने हरी आपल्यावर प्रसन्न होतो व आपल्यावरील संकटाचे निवारण करतो. 

ओवी :  जीव वेची माता । बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता । प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारण ॥३॥

अर्थ : लहान मुलाला काही दुखणेबाने आले असता त्याची आई आपला जीव देखील देण्यास तयार होते. हि प्राकृत आईची गोष्ट झाली आणि हा तर दाता प्राकृतासारखा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "हि माझ्या अनुभवाला आलेली गोष्ट सांगितली. मात्र निःस्सीम भक्त बनले पाहिजे वरवर भक्ती केली असता काही उपयोग होत नाही."

भावार्थ : आई व मुलाचे नाते वात्सल्याचे आहे, प्रेमाचे आहे. आईला आपले मुलं काळजाचा तुकडा वाटतो. म्हणूनच आई आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. तिचा सर्व जीव आपल्या मुलावर असतो. म्हणूनच आपल्या मुलाला काही दुखले खुपले तर आई स्वतःचा जीव द्यायला मागेपुढे पाहत नाही. खरेतर जगातील कुठलीही आई आपल्या मुलासाठी जीव द्यायला तयार होते आणि हे स्वाभाविकच आहे. कारण आईच्या पोटातून मुलाचा जन्म होतो व आई आपल्या पोटच्या गोळ्याला कधीही दूर सारत नाही. 

         जसे आई व मुलाचे नाते असते तसेच हरीचे व भक्ताचे नाते मायेचे, प्रेमाचे, वात्सल्याचे असते. हरी आपल्या भक्तांवर अंतःकरणापासून प्रेम करतो. आपल्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. त्यांना कधीही अंतर देत नाही. भक्तांवर कुठलेही संकट येवू देत नाही व आलेच तर त्याचे लगेच निवारण करतो. थोडक्यात हरी आपल्या भक्तांची आई झालेला असतो. परंतु भक्ताची हरीवर नितांत श्रद्धा पाहिजे, त्याची निःस्सीम भक्ती पाहिजे. अंतःकरणापासून  केलेली भक्ती हरीपर्यंत पोहोचते. वरवर केलेली (भक्तीचा दिखावूपणा केलेली) व स्वार्थापोटी केलेली भक्ती हरीपर्यंत पोहचत नाही. हरी हा भक्तीचा भुकेला आहे व जो भक्त निःस्सीम भक्ती करतो तोच हरीला आवडतो. हरी त्याला आपल्या हृदयात स्थान देतो. 

         तुकाराम महाराज अंतःकरणापासून हरीची (विठ्ठलाची) भक्ती करायचे, त्याचे नामःस्मरण घ्यायचे. विठ्ठलनामात तल्लीन व्हायचे. हीच भक्ती हरीला आवडायची. म्हणूनच हरी तुकाराम महाराजांवरील संकटाचे निवारण करायचा. त्यांना कुठलेही श्रम पडू देत नव्हता कि कुठलीही चिंता करू देत नव्हता. सतत परमार्थ करत राहिल्याने नारायण त्यांना साह्य होता व हाच त्यांना आलेला अनुभव त्यांनी या अभंगात सांगितला आहे.


 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...