Saturday, June 25, 2022


अवीट गोडीचे गाणे - मी रात टाकली, मी कात टाकली

          'मी रात टाकली, मी कात टाकली' हे अवीट गोडीचे गाणे जैत रे जैत या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल असून निर्माता निर्माता उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर आहेत. या चित्रपटात मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणी ना. धों. महानोर यांनी लिहिली असून हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केली आहेत तर लता मंगेशकर, रवींद्र साठे, आशा भोसले यांनी स्वरबद्ध केली आहेत. 

           'मी रात टाकली, मी कात टाकली' हे गाणे लता मंगेशकर, रवींद्र साठे यांनी गायले असून स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झाले आहे. चिंधी(स्मिता पाटील) हिचा काडीमोड होतो. ती आपल्या नवऱ्यापासून फारकत घेते व त्याच्यापासून मुक्त होते. तिचे गावातीलच नाग्या (मोहन आगाशे) या तरुणावर प्रेम असते. तिच्या मनात त्या तरुणाने घर केलेले असते. त्याच्याबरोबर लग्नगाठ बांधायला तयार असते. म्हणूनच ती म्हणते कि, 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली' 


मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली ।

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती ।

ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती ।

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली ।


 

 


आनंदाचे डोही आनंद तरंग ।

 


 

 आनंदाचे डोही आनंद तरंग ।

          आपण एखाद्याला आनंद देतो म्हणजे काय तर आपणच केलेल्या एखाद्या चांगल्या कृतीतून दुसऱ्याचे समाधान करतो, सुख प्राप्त करतो आणि दुसऱ्याच्या सुखात आपले सुख शोधतो ते सुख म्हणजेच आनंद होय. आपल्या हातून एखादे सत्कर्म घडले म्हणजेच निःस्वार्थ भावनेने दानधर्म केला, एखाद्याची सेवा केली, दीन-दुबळे, गरीबांना मदत केली तर त्यातून जो आपल्याला आनंद मिळतो तो सर्व सुखाच्या पलीकडचा असतो. पैसा-अडका, धनदौलत, संपत्ती या गोष्टींपासून आपल्याला क्षणिक आनंद मिळतो कारण या आनंदाबरोबर चिंता, दुःख बरोबर येत असतात. आपल्याकडे आहे ती संपत्ती, धनदौलत संपणार तर नाही ना किंवा यात आणखी कशी भर पडेल याची चिंता लागून राहिलेली असते तसेच यातील संपत्ती, पैसा नष्ट झाला किंवा खर्च झाला, चोरून नेला तर दुःख प्राप्त होते. म्हणूनच पैसा-अडका, संपत्ती या क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत व या गोष्टींपासून मनाचे समाधान होण्याऐवजी मानसिक त्रासच होत असतो कारण या गोष्टी मिळवण्यासाठी माणूस या गोष्टींच्या मागे धावत सुटतो व आपले सुख गमावून बसतो. 

          "मन आनंदी तर सर्व काही आनंदी" अशी एक म्हण आहे. खरोखरच आपले मन आनंदी असेल तर आपल्याजवळ असणाऱ्या सर्व गोष्टींपासून आनंद मिळवता येतो. फक्त तो आनंद कसा मिळवायचा हे आपण ठरवले पाहिजे. अगदी साध्या गोष्टीतूनही आपल्याला आनंद मिळवता येतो. वाचनातून, लिखाणातून, संगीत ऐकण्यातून, चांगल्या ठिकाणी फिरायला जाण्यातून, लोकांशी संवाद साधण्यातून, समाज कार्यातून इ. अशा गोष्टींपासून मनाला आनंद मिळतो. या आनंदातूनच चांगले विचार (happy thought) मनात येतात. चांगल्या विचारांमुळे मनातील नकारार्थी विचार (nigetive thinking) निघून जाऊन सकारात्मक विचार (possitive thinking) येतात व हेच विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतात. 

         तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, "आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचे ।।" तुकाराम महाराजांवर एकामागून एक आपत्ती येत होत्या, संकटे कोसळत होती तेव्हा त्यांनी भक्तीमार्ग स्विकारला. ते विठ्ठलाची भक्ती करू लागले. त्यातूनच त्यांना आनंद, समाधान मिळू लागले. म्हणूनच आपले मन आनंदीत, प्रफुल्लीत ठेवले पाहिजे. मनातील नकारात्मक विचार झटकून सकारात्मक विचार केले पाहिजेत तरच आपले जीवन आनंदमय, चैतन्यमय वाटू लागेल. जीवनाचा पूर्ण आस्वाद घेता येईल. 

 

 BEE HAPPY 

 

 

 

 

 

 

 

Friday, June 24, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।।

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।।

पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।। १ ।।

     अवघा होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ।। २ ।।

न लगे धन मान । देहभावें उदासीन ।। ३ ।।

      तुका म्हणे मळ । नासी तात्काळ हे स्थळ ।। ४ ।। 

ओवी : पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।। १ ।। अवघा होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ।। २ ।।

अर्थ : जो पंढरीस जातो, तो आपल्या आईबाप, गणगोत इ. ना विसरतो. तो सर्व पांडुरंगरूप होतो व त्याच अंगाने राहतो. 

भावार्थ : पंढरपूर, विठ्ठलाचे वसतीस्थान. तिथे आहे पांडुरंगाचा निवास. कटीवर कर ठेवून, प्रेमभावेने विठ्ठल आपल्या भक्तांकडे बघत युगानुयुगे विटेवर उभा आहे. त्याचे सावळे, सुंदर, मनोहारी रूप बघितले कि डोळे सुखावतात. धन्य झाल्यासारखे वाटते. गळ्यात तुळशीमाळा घातल्या आहेत, मस्तकावर मुकुट धारण केला आहे, कानात मकरकुंडले घातली आहेत, पीतांबर नेसला असून भरजरी शेला पांघरला आहे, कपाळावर कस्तुरी मळवट भरला आहे. असे विठ्ठलाचे विलोभनीय, मनोहरी रूप पहिले की भक्तजन विठ्ठलाच्या प्रेमात पडतात, त्याच्या रूपावर भाळतात. विलोभनीय रूप डोळ्यात साठवतात. आपल्या अंतर्मनात त्याच्या रूपाचा ठसा उमटवतात. देहभान विसरून स्वतःला, सर्व नातेवाईकांना म्हणजेच आईबाप, भाऊ-बहीण, बायको-मुलं, गणगोत इत्यादींना विसरून विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहत बसतात. त्या रूपाशी एकरूप होतात, विठ्ठलमय होऊन जातात (त्याच स्थितीत किंवा अंगाने राहतात). 

ओवी : न लगे धन मान । देहभावें उदासीन ।। ३ ।। तुका म्हणे मळ । नासी तात्काळ हे स्थळ ।। ४ ।। 

अर्थ : द्रव्य व मान ह्यांची इच्छा त्याच्यामध्ये राहत नाही, कारण तो देहाविषयी उदास असतो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे ठिकाण मळाचा तात्काळ नाश करणारे ठिकाण आहे. 

भावार्थ : पंढरपूरला आल्यावर व सावळया विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर भक्तजन देहभान हरखून जातात, स्वतःला विसरतात. त्यांच्यातील अहंकार, गर्व, 'मी' पणा गळून पडतो.(त्रिगुणमळाचा नाश होतो). ते फक्त विठ्ठलमय होतात. त्यांच्या मनात फक्त विठ्ठलाचेच भाव येतात. त्यांचे मन विठ्ठलभक्तीकडे, नामःस्मरणाकडे ओढले जाते. मनात वाईट विचार येत असतील तर ते निघून जातात. द्रव्याबद्दल (पैसा-अडका, संपत्ती, सुवर्णअलंकार इ.) तिटकारा वाटू लागतो. विठ्ठलभक्तीपुढे हे सारे कस्पटासमान वाटू लागते. विठ्ठलापुढे सारे भक्तजन सारखे आहेत. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. त्यामुळे मान-अपमानाचा संबंध येत नाही. पंढरपूरमध्ये आल्यावर सर्व भक्तांना समान वागणूक मिळते. तिथे दुजाभावपणा, 'मी'पणा नाही, अहंकाराला थारा नाही तसेच क्रोध, मत्सर, लोभ, वासना इ. वाईट गोष्टींना थारा नाही. हे विचार आपोआपच मनातून निघून जातात. म्हणूनच तुकाराम म्हणतात कि, 'पंढरपूर हे ठिकाण त्रिगुणमळाचा नाश करणारे ठिकाण आहे.'





















 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...