Sunday, February 23, 2020

अवीट गोडीचे गाणे -- किती सांगू मी सांगू कुणाला

 


अवीट गोडीचे गाणे -- किती सांगू मी सांगू कुणाला 

      'किती सांगू मी सांगू कुणाला' हे गीत सतीचं वाण या चित्रपटातील आहे. मालाईने केलेली सोरटी सोमनाथाची भक्तीची कथा म्हणजेच सतीचं वाण. हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता दत्ताराम गायकवाड तर दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी होते. या चित्रपटाची कथा आबाजीराव पवार यांनी लिहिली तर पटकथा, संवाद आण्णासाहेब देऊळगांवकर यांनी लिहिले. या चित्रपटातील गीते जगदीश खेबूडकर   यांनी लिहिली तर प्रभाकर जोग यांनी संगीत दिले. या चित्रपटातील गीते आशा भोसले, सुलोचना चव्हाण व जयवंत कुलकर्णी यांनी गायली. आशा काळे, कृष्णकांत दळवी, धुमाळ, ललिता पवार, वसंत शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
          'किती सांगू मी सांगू कुणाला' हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले असून या गीताला प्रभाकर जोग यांनी संगीत दिले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे.  

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला

अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, ओठावर बासरी, भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपालकाला

खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे

लपुन छपुन गिरिधारी, मारितो ग पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला


Saturday, February 22, 2020

प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे !


प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे !

          "प्रेमात आणि युध्दात सारं काही क्षम्य असतं" हि म्हण पूर्वीपासून प्रचलित आहे. जसे घर बघावे बांधून, लग्न पाहावे करून तसेच या वाक्यात आणखी एक वाक्य घातले पाहिजे, ते म्हणजे प्रेम पाहावे करून. प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे अशी एक काव्यपंक्ती आहे. प्रेम हे फक्त प्रेमच असू शकतं त्यामुळे प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही. कारण प्रेम हे देवाने दिलेली देणगी आहे. प्रेम हा कॉलेज युवक युवतींचा आवडता विषय आहे तसेच नाटक-सिनेमा दिग्दर्शक, लेखक, कवी यांचाही आवडता विषय आहे. यांनी प्रेम या विषयाची महती सांगण्याचा बराच प्रयत्न केला आहे. पण प्रेम म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच राहते. प्रेमाचा अर्थ हा जसा निघेल तसा आहे. प्रेम म्हणजे दोन मनांचे, हृदयाचे मिलन होय. प्रेम हे आई-मुलगा, भाऊ-बहीण, नवरा-बायको, युवक-युवती यांच्यात होते. पण प्रत्येकाच्या प्रेमात वेगवेगळया भावना दडलेल्या असतात. प्रत्येकाच्या प्रेमात वासना नसून चांगल्या भावना आहेत. प्रत्येकाच्या प्रेमाचे अर्थ निराळे आहेत. प्रेम हे पवित्र नाते मानले जाते. आणि या नात्याला कोणतीच उपमा देता येत नाही. हे प्रेमाचे नाते म्हणजे देवाघरची देणगी आहे. 
          प्रेम कुठेही, केव्हाही होऊ शकतं. प्रेम हे बस स्टॉप, ऑफिस,      बाग-बगीचे, सिनेमा, नाटयगृहे, कॉलेज या ठिकाणी जमते. प्रेम जमण्याची ठिकाणे वेगळी असली तरी अर्थ एकच होतो, तो म्हणजे दोन मनांचे मिलन. जेंव्हा एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते, तेव्हाच प्रेम होते. त्यामुळेच कि काय "प्यार किया नहीं जाता, हो जाता हैं" असे हिंदी गाण्यात म्हणले आहे. प्रेमाची महती सांगणारी अनेक उदाहरणे आहेत. शिरी-फराह, लैला-मजनू, हिर-रांजा, बाजीराव-मस्तानी, मुमताज-शाहजहान, सलीम-अनारकली, अशी कित्येक उदाहरणे प्रसिध्द आहेत. यांच्या प्रेमात वासना दडलेली नव्हती. त्यामुळेच यांचे प्रेम आजही अमर आहे. त्यांनी प्रेम करताना जातपात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही. 
          प्रेमाची सुरवात हि तारूण्याच्या उंबरठयावर असतानाच होते. जेव्हा मुलगा आणि मुलगी वयात येतात तेव्हा त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते. चोरून एकमेकांकडे पाहणे, नेत्रकटाक्ष टाकणे, चोरून भेटणे इत्यादी प्रकार वयात आल्यावर घडतात. यातूनच काहीवेळा एकतर्फी प्रेमाची सुरवात होते. तो किंवा ती प्रेमाला प्रतिसाद देत नसेल तर आत्महत्या, खून, बलात्कार, जाळपोळ इत्यादी भीषण प्रकार घडतात. यात कुणालातरी आपले प्राण गमवावे लागतात. प्रेम हे त्यागातून, विरहातून निर्माण होते. जेव्हा आपण एखादया आवडत्या गोष्टीचा त्याग करतो तेव्हा त्या गोष्टीचे महत्व कळते. तसेच प्रेमाच्या बाबतीतही होते. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा त्याग करतो, तेव्हा होणाऱ्या दु:खामुळे त्या व्यक्तीबद्दल अधिकच प्रेम भावना निर्माण होतात. जी व्यक्ती प्रेम करू शकते, त्याच व्यक्तीला प्रेम विरहही सहन करता आला पाहिजे. तरच ती व्यक्ती खरी प्रेमी ठरू शकते. 
          प्रेमाच्या जोरावर सावित्रीने आपल्या नवऱ्याला यम दरवाजातून सोडवून आणले. प्रेमापुढे देव-दानव झुकले आहेत तर मानवाची काय  कथा ? काही प्रश्न युध्दामुळे सोडविणे शक्य होत नाही, तेच प्रश्न प्रेमामुळे सोडविणे शक्य होते एवढे प्रेमात सामर्थ्य आहे. त्यामुळे प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही. याचे कारण म्हणजे प्रेम हे देवाघरचे देणे आहे. देवाने दिलेली देणगी आहे. 
                                                                             
                                                                       संतोष वसंत जोशी,
                                                                       वाई, जिल्हा सातारा











 

























 

Saturday, February 15, 2020

अवीट गोडीचे गाणे -- राधा कृष्णावरी भाळली


 अवीट गोडीचे गाणे -- राधा कृष्णावरी भाळली 

      हे गीत राधा कृष्ण यांच्या मनोमिलनाचे आहे. राधेचे कृष्णावर निखळ प्रेम आहे. दोघेही प्रीतीत अखंड बुडालेले असतात. कृष्ण आपल्या बासरी वादनाने राधेला मोहित करीत असतो. राधेला कृष्ण भेटीची ओढ लागलेली असते. कधी एकदा कृष्णाला बघते असे तीला झाले असते. दोघांच्या प्रीतीची माहिती गोकुळवासीयांच्या कानी पडते. त्यांच्यात कुजबुज चालू होते. 
         दोघांचे मनोमिलन होते तेव्हा सारी सृष्टी मोहरून उठते. झाडे, वेलींना टवटवी फुटते. फुलाफुलांतून सुगंध दरवळू लागतो. कोकीळ सुस्वरात गायला लागते. पक्षीही आपल्या मधुर किलबिलाटाने सारा आसमंत उजळून टाकतात. साऱ्या आसमंतात आनंद पसरलेला असतो. दोघांचे मनोमीलन बघण्यासाठी इंद्रपुरी अवतरली. 
           राधा कृष्णाच्या मीलनावर सुंदर असे गीत पी. सावळाराम यांनी लिहिले आहे. या गीताला संगीत वसंत प्रभू यांनी दिले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुस्वर आवाजात हे गीत गायले आहे.

राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी ।। धृ  ।।

अमृत वृक्षी फुलला मोहर
कोकिलकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून फुलाफुलांतून
नवलकथा दरवळली ।। १ ।।

वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्तीची ओढ तियेची
नीळजळी थयथयली ।। २ ।।

अमरप्रीतीचे गीत लाघवी
हरि अधरीची वेणू वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली ।। ३ ।।  


 

Saturday, February 8, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी ३ ते ५)




तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी ३ ते ५)

अवघे जन गडी । घाला उडी भाईनो ।। ३ ।।
हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप आनंदाचे जळ ।। ४ ।।

अर्थ : अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहा पण या ठिकाणी उडी घालून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. कारण हरिनाम आनंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे नाही, म्हणजे मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही. 
भावार्थ : तुकाराम महाराजांना असे म्हणायचे आहे कि, हरिनामाच्या आनंदाचा पूर आत्ताच आला आहे. या पुरात तुम्ही उडी मारून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. म्हणजेच विठ्ठलनामात तल्लीन व्हा, त्याचे सतत नामःस्मरण घ्या. व हे नामःस्मरण घेताना संसारातील सर्व पाश, मोह, माया, अहंकार या सर्व गोष्टी तिथेच टाकून द्या. या सर्व गोष्टींचा त्याग केल्यावर हरीनामाचा आनंद लुटता येतो. हा आनंद मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात घेता येणार नाही व मनुष्यजन्म एकदाच मिळतो. पण या जन्मात मनुष्य संसारातच गुरफटला जातो व त्याला हरीनाम घ्यायला वेळच मिळत नाही. म्हणजेच त्याला हरीनामाचा आनंद लुटता येत नाही. अशा लोकांना तुकाराम महाराज सांगतात कि, अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहा पण या ठिकाणी उडी घालून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. कारण हरिनाम आनंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे नाही, म्हणजे मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही. 

तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ।। ५ ।।

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, जन्मजन्मांतरींच्या थोर पुण्याईमुळे ह्या भक्तीमार्गाचा ओघ आला आहे. 
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलाची भक्ती करू लागले, विठ्ठलनामात अखंड बुडू लागले. भजन-कीर्तनात दंग होऊ लागले. त्यातच त्यांचे भान हरपून जाऊ लागले. ते विठ्ठलभक्तीत एवढे रममाण होत कि त्यांना जगाचा विसर पडत असे. त्यांनी संसारातील सर्व पाश, आशा, लोभ सोडले व विठ्ठलचरणी लीन झाले. विठ्ठलालाच त्यांनी सर्वस्व मानले. त्यांनी अंतःकरणापासून केलेली भक्ती बघून विठ्ठलही भारावला व त्याने तुकाराम महाराजांना दर्शन दिले. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, "जन्मजन्मांतरीच्या थोर पुण्याईमुळे हा भक्तीमार्ग सापडला." म्हणजेच तुकाराम महाराजांनी याचे श्रेय जे काही पुण्य केले असेल त्याला दिले आहे.









































Friday, February 7, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी १ व २)

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी १ व २)

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ।। १ ।। 
बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनि जाऊं पैल थडी ।। २ ।। 

अर्थ : हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे व हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. विठ्ठलनामाची सांगड बांधून संसारसागराच्या पार तरून जाऊ. 

भावार्थ : हरीच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे म्हणजेच विठ्ठलाचे भजन गायल्याने मनाला समाधान मिळते. विठ्ठलाच्या भजनातच इतका गोडवा आहे कि माणूस भजन गाताना तल्लीन होऊन जातो. त्याचे भान हरपून जाते. भजन गाणारा व ऐकणारा दोघेही आनंदी, समाधानी होतात. भजनाच्या गोडव्याने भजन ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात. हरीचे भजन गाणाऱ्याच्या मुखातून पवित्र, निर्मळ शब्द बाहेर पडत असतात तर हे शब्द ऐकणाऱ्याच्या कानामध्ये शिरत असतात. त्यामुळे दोघांनाही परमोच्य आनंद प्राप्त होत असतो. हरीचे म्हणजेच विठ्ठलाचे भजन चालू असते तेव्हा वातावरण भारावलेले असते. वातावरण पवित्र, शुध्द होते. जेथे भजन चालू आहे तेथे वाईट, अनिष्ट गोष्टींना पायबंद घातला जातो. मनात वाईट विचार सोडून चांगले विचार येत असतात. भजनाच्या गोडव्यामुळे हरीविषयी प्रेम वाटू लागते. सागराच्या लाटा जशा उसळतात तसे भजनातील शब्दाने मनात हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत असतात. म्हणजेच हरीविषयी वाटणारे प्रेम घट्ट होत जाते. 
                  सर्वात जास्त पवित्र व निर्मळ कुठले नाम तर विठ्ठलनाम. अमृताहूनही गोड असे विठ्ठलनाम आहे. या नामात गोडवा आहे. हे नाम घेतल्याने मनाला सुख, समाधान मिळते. आनंद प्राप्त होतो. साऱ्या चिंता, विवंचना मिटून जातात. माणूस संकटात सापडला कि 'विठ्ठला, पांडुरंगा' असा धावा करतो. म्हणजेच माणसाला संकटातून सोडवण्याची ताकत(शक्ती, power) या नामात आहे. हे नाम घेतल्याने संसारातील सर्व पाश, आशा, आकांक्षा, लोभ, सर्व चिंता, विवंचना मिटून जातात. माणसाचे संपूर्ण जीवन विठ्ठलमय होऊन जाते. माणूस भक्तिमार्गाला लागतो. विठ्ठलनामामुळे संसाराचा अथांग सागर आहे तो सहज पार करून देवापर्यंत पोचतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "विठ्ठलनामाची सांगड बांधून संसारसागराच्या पार तरून जाऊ."


















तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...