Saturday, June 10, 2023

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।।

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।।

 

 बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।। १ ।।

     जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ।। २ ।।

जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ।। ३ ।।

तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ।। ४ ।।

ओवी : बोलायाचा त्याशीं । नको संबंध मानसी ।। १ ।। जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ।। २ ।।

अर्थ : जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये. अहो गोविंदा, तुम्हाला विसरून ज्याचेकडून संतांची निंदा झाली आहे. 

भावार्थ : तुकाराम महाराजांनी या अभंगात असे म्हणले आहे कि, जो कोणी गोविंदाला (पांडुरंगाला) विसरून, त्याची भक्ती करायची सोडून वाईट मार्गाने जात आहेत. तसेच संतांबद्दल अपशब्द बोलून त्यांची निंदा करत आहेत. त्यांची वचने, चांगले विचार ऐकत नाहीत तसेच त्यांना संतांचा सहवास आवडत नाही अशा दुर्जन माणसांशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये कारण दुर्जन माणसांच्या सहवासात आल्यावर व त्यांच्याशी बोलल्यावर ते जसे संतांची निंदा करतात व त्यांचे तोंडातून संतांबद्दल अपशब्द बाहेर पडतात तसेच आपल्याही तोंडातून संतांबद्दल अपशब्द बाहेर पडतील व त्यांची निंदा केली जाईल म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, 'जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मनात देखील संकल्प येऊ नये.'  

ओवी : जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ।। ३ ।। तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ।। ४ ।।

अर्थ : त्याचे तोंडाला आग लागो. असला तो भांडखोर माझे दृष्टीपुढेसुद्धा नको. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, असल्या दुर्जनापासून मला दूर ठेवा.  

भावार्थ : जे संतांची निंदा करतात, सतत भांडतात तसेच त्यांच्या तोंडातून अपशब्द म्हणजेच शिव्याशाप बाहेर पडतात अशा लोकांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात कि, 'त्याचे तोंडाला आग लागो. अशा लोकांचे तोंडसुद्धा मला पाहण्याची इच्छा नाही. असला तो भांडखोर माझे दृष्टीपुढेसुद्धा नको.' तुकाराम महाराज देवाला विनवणी करताना म्हणतात कि, जे संतांची निंदा करतात व तुझे नामस्मरण घेत नाहीत व तुझी भक्ती करत नाहीत अशा माणसांपासून मला दूर ठेवा. त्यांचा सहवास मला नको कारण त्यांचे सहवासाने मी तुमची भक्ती करायची विसरून व संतांची वचने, चांगले विचार ऐकायचे सोडून त्यांचेप्रमाणेच संतांची निंदा नालस्ती करीन व सतत भांडत राहीन.

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...