Saturday, June 22, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥

ओवी : आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥ 

अर्थ : जे ब्रह्म आनंदरूप, एकटे, अविनाश, निर्मळस्वरूप आहे व ज्या निजवस्तूचे योगीजन ध्यान करितात, ते विठ्ठलाचे रूप भीमेच्या तीराला समचरण जोडून कटावर कर ठेवून शोभिवंत दिसत आहे, ते तुम्ही पहा. 

भावार्थ : तुकाराम महाराजांनी या अभंगात विठ्ठलाचे रूप छान वर्णिले आहे. ब्रह्म म्हणजेच विठ्ठल. तर हे ब्रह्मरूप कसे आहे तर आनंदरूप आहे. विठ्ठल म्हणजेच आनंद. विठ्ठलाचे रूप पाहिल्यावर मन आनंदी होते. मनाला सुख प्राप्त होते. त्याच्याजवळच आनंद ओसंडून वाहत असतो. म्हणूनच ते आनंदरूप आहे. विठ्ठल हा एकटा आहे म्हणजेच त्याच्याजवळ कोणतेही पाश नाहीत. त्याच्याजवळ कोणतीही अभिलाषा नाही. विठ्ठलरूप हे अविनाश आहे म्हणजेच ह्या रुपाला अंत नाही, हे रूप अनंत आहे. हे रूप कधीही नाश पावणार नाही. विठ्ठलरूप निर्मळस्वरूप आहे म्हणजेच या रुपाजवळ मोह, माया, क्रोध, वासना, लोभ, मत्सर हे दुर्गुण फिरकत नाहीत. उलट आनंद, शांती, समाधान, सुख हे सद्गुण ओतप्रोत भरलेले आहेत. हे रूप पाहिल्यावर मन प्रसन्न होते, आनंदी होते, समाधान पावते. म्हणूनच योगीजन व संत-महंत या रूपाचे ध्यान करितात. 

          हे विठ्ठलाचे रूप भीमेच्या तीराला समचरण जोडून व कटावर कर ठेवून (कंबरेवर हात ठेवून) विटेवर उभे आहे तसेच दोन्ही कानात मकरकुंडले घातली आहेत, डोक्यावर सोन्याचा मुकुट परिधान केला असून गळ्यात वैजयंती माळ घातली आहे तसेच तुळशीमाळा घातल्या आहेत. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे. कंबरेला पीतांबर नेसला असून अंगावर भरजरी शेला पांघरला आहे. असा हा शोभिवंत मदनाचा पुतळाच आहे. हे विठ्ठलाचे शोभिवंत, डोळ्यांना सुख देणारे रूप सर्वानी पाहावे असे तुकाराम महाराज सांगत आहेत. 

ओवी : पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥ तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥

अर्थ : जे पुराणास कळले नाही व ज्याचे वर्णन वेदश्रुतीस होत नाही ते पुंडलिकरायाकरीता साकार झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या पांडुरंगाचे ध्यान सनकादिक करतात ते आमचे कुळदैवत आहे. 

भावार्थ : विठ्ठल हा भक्तवत्सल आहे. त्याचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम आहे. आपल्या भक्तांसाठी तो माउलीसमान आहे. आपल्या भक्तांची तो काळजी वाहत असतो तसेच त्यांच्या हाकेला ओ देतो. विठ्ठल व भक्ताचे नाते प्रेमाचे, मायेचे, ममतेचे आहे. या नात्यामुळेच, प्रेमापोटी पुंडलिकाकरीता विठ्ठल सगुण साकार झाला. हे विठ्ठलाचे आनंदमय, अविनाश, निर्मळ असे स्वरूप पुराणासही कळले नाही व वेदश्रुतीतही तो सापडत नाही असे हे स्वरूप भक्तांसाठी धावून येणारे रूप आहे. म्हणूनच या पांडुरंगाचे ध्यान संत-महंत, सनकादिक करतात. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आपले सर्वस्व मानले आहे. त्यांचे घरातच पहिल्यापासून विठ्ठलाची पूजा केली जायची, पंढरपूरची वारी केली जायची. तुकाराम महाराजही विठ्ठलाची पूजाअर्चा करू लागले, त्याचे नामस्मरण करू लागले. पंढरपूरच्या वारीला जावू लागले. विठ्ठलाची अखंड भक्ती करू लागले. विठ्ठलालाच त्यांनी आपले कुळदैवत मानले. म्हणूनच ते म्हणतात कि, पांडुरंग आमचे कुळदैवत आहे.

 

आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, June 21, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥

तुकाराम महाराज गाथा - अभंग - माझी विठ्ठल माउली । प्रेमेंपान्हा पान्हाइली ॥

माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥४॥

ओवी : माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥ कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥

अर्थ : माझी विठ्ठल आई आहे ती मजविषयीच्या प्रेमपान्ह्याने पान्हावली आहे. मला कुरवाळून तिने आपल्या स्तनी लाविले आहे. ती माझ्या जवळून दूर जात नाही. 

भावार्थ : तुकाराम महाराजांचे व विठ्ठलाचे नाते वात्सल्याचे आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांची आई आहे तर तुकाराम महाराज विठ्ठलाचे लेकरू. आई आपल्या लेकरावर मनापासून प्रेम करत असते म्हणूनच आपल्या लेकराला पाहिल्यावर तिला पान्हा फुटतो. लेकराला प्रेमाने कुरवाळून आपल्या स्तनाला लावून लेकरू तृप्त होईपर्यंत दूध पाजते. लेकरू दुध पिवून तृप्त झाले कि आईला समाधान होते. तसेच विठ्ठलालाही तुकाराम महाराजांना पाहिल्यावर प्रेमपान्हा फुटतो. म्हणजेच विठ्ठल तुकाराम महाराजांवर अतोनात प्रेम करतो. आपल्या प्रेमपान्ह्याने तुकाराम महाराजांना चिंब भिजवतो. तुकाराम महाराज तृप्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करतो. जोपर्यंत तुकाराम महाराज तृप्त होत नाहीत, समाधान पावत नाहीत तोपर्यंत विठ्ठल त्यांच्यापासून दूर जात नाही.  

ओवी : केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥४॥

अर्थ : मी जो जो म्हणून हट्ट करीत आहे तो तो ती पुरवीत आहे, कारण ती निष्ठूर नसून कनवाळू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ती माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास घालीत आहे. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांची आई असल्याने आपल्या भक्तांवर कधीच निष्ठूर नसते उलट आपल्या भक्तांबाबत प्रेमळ,कनवाळू असते. या प्रेमामुळेच विठ्ठल आपल्या भक्तांचे लाड करीत असतो. भक्त जे जे हट्ट करतील ते ते हट्ट प्रेमाने पुरवीत असतो. विठ्ठल तुकाराम महाराजांची आई झाल्याने त्यांच्याबाबतही प्रेमळ, कनवाळू आहे व या प्रेमापोटीच तुकाराम महाराज जे जे हट्ट करतील ते ते हट्ट लाडीकपणे पुरवीत असतो. तसेच आई जसे प्रेमाने आपल्या बाळाला घास भरविते तसेच विठ्ठलही तुकाराम महाराजांना प्रेमाने ब्रह्मरसाचा घास भरवीत आहे.  

 


Monday, June 17, 2024

बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट - १९८५ अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान

 

बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट - १९८५ अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 

अंतिम सामना - १० मार्च १९८५ (दिवस-रात्र) 

 भारत विरुद्ध पाकिस्तान 

श्रीकांतच्या धडाकेबाज खेळीमुळे व रवी शास्त्रीच्या टिच्चून फलंदाजीमुळे भारत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स 

          हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळवण्यात आला. या सामन्यात रेमंड इशरवूड (ऑस्ट्रेलिया) व टोनी क्राफ्टर (ऑस्ट्रेलिया) यांनी पंच म्हणून काम पाहिले. धडाकेबाज खेळीमुळे (७७ चेंडूत ६७ धावा) के श्रीकांतला सामनावीर पुरस्कार दिला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

          भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात दोन आशियाई व शेजारील देश चषकासाठी खेळत होते. हा सामना बघण्यासाठी ३५२९६ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात नसूनसुद्धा इतक्या प्रेक्षकांनी उपस्थिती लावणे म्हणजे एक आश्चर्यच होते. अंतिम सामना जिंकून  बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट चषकावर कुणाचे नाव कोरले जाणार याची उत्सुकता उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना व दूरदर्शनवरून बघणाऱ्या तमाम प्रेक्षकांना लागून राहिली होती. भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ ची विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे सर्व देशांचे लक्ष भारताकडे लागले होते. भारताने या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती त्यामुळे अंतिम सामन्यातही उत्कृष्ठ कामगिरी करून भारत चषकावर आपले नाव कोरणार का याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली होती. 

          पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला सुरवात केली. डावाची सुरवात मुदस्सर नजर व मोहसीन खान यांनी केली. दोघांनी डावाची सुरवात सावध केली. धावसंख्या १७ झाली असताना मोहसीन खान अवघ्या ५ धावा काढून कपिल देवाच्या गोलंदाजीवर मोहमद अझरुद्दीनकडे झेल देऊन बाद झाला. धावसंख्या २९ झाली असताना कपिल देवने मुदस्सर नजरला १४ धावांवर यष्टीरक्षक विश्वनाथकडे झेल द्यायला लावून पाकिस्तानला झटका दिला. अशा तऱ्हेने कपिल देवने सलामीची जोडी २९ धावात तंबूत धाडली. कपिल देवनेच सुंदर चेंडू टाकून कासीम उमरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाबाद करून आणखी एक झटका दिला. उमर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची ३ बाद २९ अशी अवस्था झाली. धावसंख्या ३३ झाली असताना चेतन शर्माने रमीझ राजाला श्रीकांतकडे झेल द्यायला लावून पाकिस्तानला जबरदस्त हादरा दिला. रमीझ राजाला अवघ्या ४ धावा करता आल्या. अशा तऱ्हेने भारतीय गोलंदाजांनी विशेषतः कपिल देवने सुंदर गोलंदाजी करत ४ पैकी ३ बळी मिळवत ३३ धावात वरची फळी गारद करून पाकिस्तानला चांगेलच अडचणीत आणले. 

          पाकिस्तानचा संघ ४ बाद ३३ अशा अडचणीत सापडला असताना जावेद मियांदाद व इम्रान खान यांनी सावध व संयम राखून खेळायला सुरवात केली. त्यांनी एकेरी, दुहेरी धावसंख्येवर भर देत धावफलक हालता ठेवला. दोघांनी धावसंख्या १०१ पर्यंत नेली. दोघांच्यात ६८ धावांची भागीदारी झाली. हीच भागीदारी पाकिस्तानसाठी सर्वोच्च ठरली. हि जोडी टिकेल असे वाटत असतानाच इम्रान खान ३५ धावा (६७ चेंडू २ चौकार) काढून धावबाद झाला. सुनील गावस्करने अचूक फेकीने त्याला धावबाद केले. इम्रान खान बाद झाला तरी जावेद मियांदाद भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करीत होता. त्याने सलीम मलिकला हाताशी धरून धावसंख्या १३१ पर्यंत नेली. दोघांच्यात ६ व्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी झाली. शिवरामकृष्णनने आपल्या फिरकी माऱ्याने सलीम मलिकला जाळ्यात ओढून चेतन शर्माकडे झेल द्यायला लावून बाद केले. मलिकने फक्त १४ धावा काढल्या. १३१ याच धावसंख्येवर  शिवरामकृष्णनने जावेद मियांदादला चकवून यष्टीरक्षक विश्वनाथकरवी यष्टिचित करून महत्वाचा बळी मिळवला. जावेद मियांदादने सयंमी व सावध खेळी करत ९२ चेंडूत २ चौकार मारत ४८ धावा केल्या. पाकिस्तानसाठी याच धावा सर्वोच्च ठरल्या तसेच त्याने इम्रान खानबरोबर केलेली ६८ धावांची भागीदारी व सलीम मलिक बरोबर केलेली ३० धावांची भागीदारी पाकिस्तानसाठी मोलाची ठरली. जावेद मियांदाद बाद झाला तेव्हा पाकिस्तानची ७ बाद १३१ अशी अवस्था झाली. 

          जावेद मियांदाद बाद झाला तेव्हा पाकिस्तान चांगेलच दडपणाखाली होते कारण दीडशेच्या आत महत्वाचे खेळाडू तंबूत परतले होते. वसीम राजा व ताहीर नकाश खेळपट्टीवर होते. १४२ धावसंख्या झाली असताना ताहीर नकाश १० धावा काढून रवी शास्त्रीच्या गोलंदाजीवर  यष्टीरक्षक विश्वनाथकडे झेल देवून बाद झाला. पाकिस्तान ८ बाद १४२. धावसंख्येत ३ धावांची भर पडल्यावर अनिल दलपत भोपळाही न फोडता शिवरामकृष्णनच्या गोलंदाजीवर रवी शास्त्रीकडे झेल देवून तंबूत परतला. दलपत बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था ९ बाद १४५ अशी होती. पाकिस्तानचा डाव लवकर संपवण्याची संधी भारतीय गोलंदाजांकडे होती परंतु हि संधी वसीम राजा व अझीम हाफीज यांनी मिळू दिली नाही. दोघेही शेवटपर्यंत भारतीय गोलंदाजीचा सामना करीत धावसंख्या वाढवत होते. शेवटी त्यांनी ५० षटकात १७६ पर्यंत धावसंख्या नेली. दोघांनी नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. वसीम राजा २१ धावा (२६ चेंडू १ चौकार) काढून नाबाद राहिला तर अझीम हाफीज ७ धावा काढून नाबाद राहिला. पाकिस्तानचा डाव ५० षटकात ९ बाद १७६ पर्यंत(३.५२ च्या धावगतीने) मर्यादित राहिला. भारतीय गोलंदाजांनी १८ अवांतर धावा (७ बाईज, ८ लेगबाय, २ नोबॉल, १ वाईड) देवून पाकिस्तानला धावसंख्या वाढवण्यास मदत केली. 

          भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ठ मारा करत पाकिस्तानला १७६ धावात रोखले. कपिल देवने उत्कृष्ठ मारा करत पाकिस्तानला पहिले तीन हादरे दिले. त्याच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण असे होते ९ षटके १ निर्धाव २३ धावा ३ बळी.  शिवरामकृष्णनने उत्कृष्ठ फिरकी मारा करत ९ षटकात ३५ धावा देत ३ गडी बाद केले. चेतन शर्मा व रवी शास्त्री यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

          विजयासाठी ५० षटकात १७७ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरवात रवी शास्त्री व के श्रीकांत यांनी केली. रवी शास्त्रीने सयंमी व सावध खेळी केली तर श्रीकांतने धडाकेबाज खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. या शतकी भागीदारीत महत्वाचा वाटा होता श्रीकांतचा. त्याने ७७ चेंडूत ६ चौकार मारत व २ उत्तुंग षटकार ठोकत जलदगती खेळी करत ६७ धावा केल्या. याच धावा भारतीय संघासाठी मोलाच्या ठरल्या तसेच त्याने शास्त्रीबरोबर केलेली १०३ धावांची भागीदारी भारतीय संघाच्या विजयाचा पाया घालून गेली. श्रीकांत बाद झाला तेव्हा भारताने १ बाद १०३ अशी मजल मारली होती. श्रीकांतच्या जागी मोहमद अझरुद्दीन खेळायला आला. त्याने व शास्त्रीने मिळून धावसंख्या १४२ पर्यंत नेली. दोघांच्यात उपयुक्त अशी ३९ धावांची भागीदारी झाली. अझरुद्दीन जलदगतीने खेळून धावा वाढवत होता. त्याने छोटी पण उपयुक्त खेळी खेळताना २६ चेंडूत ३ चौकार मारत २५ धावा केल्या. ताहीर नकाशने त्याला त्रिफळाबाद केले. 

          अझरुद्दीन बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती व भारताचे ८ फलंदाज खेळायचे बाकी होते तसेच रवी शास्त्री एका बाजूला घट्टपणे पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता व धावा वाढवत होता त्यामुळे भारत विजयाला कधी गवसणी घालणार व चषक आपल्या नावावर करणार याची एकच उत्सुकता तमाम भारतीय प्रेक्षकांना लागून राहिली होती. सर्व प्रेक्षक भारताच्या विजयाकडे डोळे लावून बसले होते व धावागणिक जल्लोष करीत होते. शेवटी शास्त्रीने व दिलीप वेंगसरकरने विजयासाठी उरलेल्या ३५ धावा काढून भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता संपवली. भारताने उत्कृष्ठ खेळ करत ४७.१ षटकात २ गडी गमावत १७७ धावा करून पाकिस्तानवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ह्या विजयात महत्वाचा वाटा होता श्रीकांतचा. त्याने ७७ चेंडूत ६७ धावा केल्या. रवी शास्त्रीही संयमी फलंदाजी करत अफलातून खेळी खेळला. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहात १४८ चेंडूंचा सामना करत ३ चौकार मारत उपयुक्त अशा ६३ धावा केल्या. दिलीप वेंगसरकरने १८ धावा करून विजयात खारीचा वाटा उचलला. फलंदाजीत व गोलंदाजीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ठ व अफलातून कामगिरी करत बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रॉफीवर (चषकावर) सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले.




          रवी शास्त्रीला 'स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू' म्हणून निवडण्यात आले तसेच त्याला बक्षीस म्हणून 'ऑडी १००' कार देण्यात आली. याच कार मधून भारतीय खेळाडूंनी मैदानावर फेरी मारली.

















 

 

 

 

 

 

 

 


Sunday, June 16, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥

 

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥

राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२।।
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३।।
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥

ओवी : राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२।।

अर्थ : हे पांडुरंगाचे विटेवरील ध्यान माझ्या डोळ्यांपुढे जसेचे तसे राहो, आणि माझे मन त्याठिकाणी सक्त होवो. मग आपल्या जीवामध्ये त्या ध्यानाला कोंडून धरीन आणि मजमध्ये असणारा जो देहभाव, तो मी त्याला वाहून पूजा करीन.  

भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीत, त्याचे नामस्मरणात अखंड बुडाले होते. विठ्ठलाच्या भक्तीरसात न्हाऊन निघत होते. भजन-कीर्तनात रंगून जात होते. त्यांनी विठ्ठलाला आपल्या अंतःकरणातच स्थान दिले होते. त्यांचे डोळ्यापुढे विठ्ठलाचे गोड गोजिरे रूप दिसत होते. कसे दिसत होते हे रूप तर डोक्यावर सोनेरी मुकुट परिधान केलेला, कानात मकरकुंडले घातलेली, कपाळी कस्तुरी मळवट भरलेला आहे, गळ्यात तुळशीमाळा घातलेल्या आहेत, कंठात कौस्तुभमणी झळकत आहे, कमरेला पितांबर नेसला आहे व त्याच्या तेजात सूर्यचंद्राच्या प्रभा लोपून गेल्या आहेत असे सावळे सुंदर विटेवर उभे राहिलेले रूप तुकाराम महाराजांना डोळ्यापुढे दिसत आहे व हे रूप (ध्यान) जसेच्या तसे डोळ्यांपुढे राहो असे त्यांना वाटत आहे. या विठ्ठलाच्या रूपावर आपले मन सक्त होवो (मन जडो) म्हणजेच विठ्ठलाच्या रूपावर आपले मन भाळले जावून विठ्ठलाबद्दल अधिकाधिक प्रेम वाढो असे त्यांना वाटत आहे. 

          तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवामध्ये त्या ध्यानाला कोंडून धरीन म्हणजेच पांडुरंगाला आपल्या जीवामध्ये म्हणजेच मनामध्ये साठवून ठेवीन. हृदयाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाला स्थान देईन. माझा संपूर्ण देह पांडुरंगाशी एकरूप होईल व मजमध्ये असणारा जो देहभाव म्हणजेच पांडुरंगाबद्दल असणारा भक्तिभाव, प्रेमभाव पांडुरंगाला वाहून त्याची पूजा करीन. 

ओवी : होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३।। तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥

अर्थ :  अशा प्रकारे ते ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाले, म्हणजे हि गोष्ट कळसाला आल्यासारखी होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोजिरवाण्या देवा, मला तुमच्या पाया पडू द्या. 

भावार्थ : तुकाराम महाराज पांडुरंगाची अंतःकरणापासून भक्ती करत होते. रात्रंदिवस त्याचे नामस्मरणात, भजन कीर्तनात तल्लीन होत होते. त्यांनी आपल्या मनामध्ये विठ्ठलाला साठवले होते. हृदयात स्थान दिले होते. त्यांच्या अंतःकरणात पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणालाही स्थान नव्हते. त्यांचे अंतःकरणातून पांडुरंगाचे ध्यान (रूप) निघू नये, ते कायमचे रहावे असे त्यांना वाटत होते म्हणूनच ते म्हणतात कि, पांडुरंगाचे ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाले म्हणजे हि गोष्ट कळसाला आल्यासारखी होईल. म्हणजेच पांडुरंगाची केलेली भक्ती, आराधना पूर्ण होईल. 

          तुकाराम महाराजांना पांडुरंगाचे गोजिरवाणे रूप डोळ्यासमोर दिसत आहे. या रूपावर ते भाळले आहेत. त्यांना पांडुरंगाबद्दल प्रेम वाटू लागले आहे. या प्रेमापोटीच त्यांना पांडुरंगाच्या पाया पडण्याचा मोह आवरता येईना. म्हणूनच ते पांडुरंगाला विनवणी करतात कि, हे गोजिरवाण्या देवा, मला तुमच्या पाया पडू द्या. 

 

                       हे पांडुरंगाचे विटेवरील ध्यान माझ्या डोळ्यांपुढे जसेचे तसे राहो

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...