Saturday, October 12, 2019

कथा लेखन स्पर्धा -- वांझ( कथा लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कथा )


कथा लेखन स्पर्धा 

वांझ 
( कथा लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कथा )
प्रसंग एक ---
"सीमाला आपल्या कार्यक्रमास बोलावू नका"
"पण का? तिने काय आपले घोडे मारलंय"
"घोडे नाही मारले पण.. असल्या बायका नको आपल्यात."
"मी समजले नाही. सीमा सुहागन आहे."
"पण ती वांझ आहे."
"यात तिचा काय दोष, तरुण आहे. होईल कि आज ना उद्या तिला मुलबाळ."
"होईल तेव्हा होईल. पण आपल्या चांगल्या कार्यक्रमात तिचा वावर नको."
"अशाने तिला काय वाटेल? हळदी कुंकवाचा तर कार्यक्रम आहे."
"बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आज डोहाळे जेवण आहे सुनबाईचं. तिची ओटी खणानारळाने भरावयाची आहे अशा वेळी सिमा पुढे आली तर नविन मुलाच्या जन्मास अडथळा येतो."
"एका बाईनं दुसऱ्या बाईची ओटी भरल्यास काही फरक पडेल असे मला वाटत नाही."
"समाज, सामाजिक रूढी आपल्या मानण्यावर नसतात. जुन्या रितीरिवाजामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या आपण पाळाव्यात. शंकेस वाव नसावा."
"म्हणजे! ममी तुला काय म्हणावयाचे आहे?"
"आग, मुलाच्या जन्मावेळी अडचण आली तर अशाप्रसंगाची वाच्यता होते. बाकी काही नाही."
              सासू विमलाताई आणि सून शांता या दोघीत हा संवाद सुरु होता. समाजरचना, त्यातील बारकावे, रुसवे, मानपान आणि अंधश्रध्दा यांनी कोणता स्तर गाठला आहे हे समजून घ्यावे लागेल. सीमाला मुलबाळ नाही यात तिची काय चूक. एखादया स्त्रीला मुलबाळ नाही यात तिचा दोष २०% तर पुरुषाचा दोष ४०% असतो. पण पुरुषाचा अहंकार आडवा येतो. एखादया बाईला मूल होत नसेल तर पुरुष दुसरे लग्न करावयास रिकामा होतो. स्त्रीच्या मनाचा, तिच्या भावभावनांचा, स्वप्नांचा विचारच कोणी करत नाही. मग समाजात पदोपदी तिचा अपमान होतो. मानहानी होते. सगळ्या बायका तिला टोचत राहतात. उपहास करतात. धर्माची भिती दाखवतात. धर्माने तिच्यावरती कोणती बंधने घातलीत हे सातत्याने तिच्या मनावर बिंबवले जाते. ती बिचारी घरातून सतावली जाते. शेजारपाजाऱ्याकडून नाडली जाते. तिचे जीवन जगणे मुश्किल होते. अशा बायकांना जास्त त्रास झाला तर त्या विहीर जवळ करतात. आत्महत्या करून रिकाम्या होतात. इतरांचा विचार करण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो.
प्रसंग दोन ---
सीमा आपल्या नवऱ्याला म्हणाली, "अहो ऐकलंत का? मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे."
नवरा म्हणाला, "बोल, मी ऐकतोय. तुझ्या मनात काय आहे ते एकदा सांगून टाक."
सीमा म्हणाली, "अहो! बायका आता उघड उघड मला वांझ म्हणू लागल्या आहेत."
"म्हणू देत. तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. इतरांवर विनाकारण टीका करणाऱ्या बायका त्या. त्यांची अक्कल तेवढीच." नवरा
सीमा म्हणाली, "पण आपण नको का यातून काही मार्ग काढायला."
नवरा म्हणाला, "आपण हातावर हात धरून बसलोय का सीमा; आपण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दोघांवर उपचार करून घेत आहोत ना."
सीमा म्हणाली, "पण आतापर्यंत एकाही डॉक्टरचा गुण आला नाही. डॉक्टरी उपचाराबरोबर आपण देवाधर्माचेही बघत आहोत पण त्याचाही काही उपयोग होत नाही."
नवरा म्हणाला, "निराश होऊ नकोस. आपल्याला शंभर टक्के अपत्य होईल. सुंदर बाळ आपल्या नशिबात आहे. वृथा चिंता करू नकोस. एखाद्याच्या नशिबात बाळाचे भाग्य उशिरा असते. त्याला आपण काय करणार. सतत त्याच त्या विचाराने त्रास होईल. एखादा आजार जडेल त्याचे काय करायचे सांग बघू."
प्रसंग तीन ---
               परवा तर कहरच झाला. सीमाचे सासरे आणि सासूबाई शेजाऱ्याच्या वास्तुशांतीला आले होते. त्यांचा संसार पाहून, मुलाबाळांनी भरलेलं घर पाहून त्यांना असूया निर्माण झाली. सासूबाई म्हणाल्या, "अगं सीमा, डॉक्टरांच्याकडे जाऊन आलीस का?"
सीमा म्हणाली, "होय आई! परवाच जाऊन आले."
"काय म्हणाले डॉक्टर?" सासूबाईंनी विचारले.
"डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट पाहिले आणि सांगितले कि किरकोळ दोष आहे तो दोन तीन महिन्याच्या औषध उपचारानंतर नाहीसा होईल." सीमा म्हणाली.
सासूबाईंनी विचारले, "दोष कुणाच्यात आहे?"
सीमाला क्षणभर वाटले नवऱ्याचे नाव घ्यावे परंतु तसे न करता ती म्हणाली, "किरकोळ दोष माझ्यातच आहे. पण काळजी करण्यासारखे काही नाही."
सासूबाई म्हणाल्या, "हो नाहीतर माझ्या पोराचे नाव घ्यायचीस आणि विनाकारण आमची बदनामी व्हायची."
              तो संवाद तिथेच संपला. पण सीमा अंतरंगात दुखावली होती.
प्रसंग चार ---
               दुपारची जेवणाची वेळ झाल्याने मी दवाखाना बंद करण्याच्या नादात होतो एवढयात सीमा माझ्या ओपीडीत आली. तिने तिचा प्रॉब्लेम सांगितला. तिची कागदपत्रे मी पहिली. वेगवेगळ्या डॉक्टर्सचे रिपोर्ट पहिले. तिचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला.
सीमा म्हणाली, "डॉक्टर साहेब, मला मूल होईल ना हो?"
" हो होईल."
"काही अडचण आहे का?" सीमाने विचारले.
"नाही. तशी अडचण काहीच नाही."
"मग अजून माझ्या नशिबात अपत्य का नाही?" सीमाने प्रश्न केला.
"सीमा थोडा दम धर. काही गोष्टींना वेळ लागतो." मी सीमाला समजावत म्हणालो.
"आता माझ्याच्याने दम धरवत नाही डॉक्टर. खरं खरं सांगा काय ते, काहीही भयंकर असले तरी माझी ऐकण्याची तयारी आहे." सीमा अगतिकपणे म्हणाली.
               मी तिला धीर देत म्हणालो, "सीमा, तुझ्या नवऱ्याच्या सीमेनमध्ये तक्रार आहे. विर्यातील शुक्रजंतू मृत होत आहेत म्हणून आपल्याला दुसऱ्या पुरुषाचे सीमेन घ्यावे लागेल. दुसऱ्या पुरुषाचे शुक्रजंतू घेऊन टेस्टटयूबमध्ये त्याचे फलन करून टेस्टटयूब बेबी तंत्रज्ञानाने बेबीचा जन्म करावा लागेल. याच्याशिवाय आता दुसरा उपाय सध्यातरी माझ्याकडे नाही."
               माझे बोलणे ऐकून सीमा सुन्न झाली. हि गोष्ट नवऱ्याला कशी सांगावी याचा ती विचार करू लागली. परपुरुषापासून अपत्यप्राप्ती हि कल्पना आपल्या नवऱ्याला आवडेल काय याचा ती विचार करू लागली. 
               सीमा निघून गेली पण तिचा अश्रूंनी भरलेला चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता. एकदा भावनाप्रधान होऊन ती म्हणाली होती, "डॉक्टर, काहीही करा. कोणताही मार्ग सांगा. तो कितीही कठीण असो. नैतिक-अनैतिकतेच्या पुढचा असो मला फरक पडणार नाही. कारण समाजाने, माझ्या घरातील माणसांनी माझे जीवन नकोसे केले आहे. कधी कधी वाटते संपवावे जीवन. घरात मी एकटीच असते. त्या भयाण एकांताने मला सर्वांचीच भिती वाटते."
             मी तिची समजूत काढत म्हणालो, "सीमा बेटी, तू माझ्या समोर बोललीस तसे इतरांसमोर बोलू नकोस. कमकुवत होऊ नकोस. तुझ्या सारख्या स्त्रीचा लोक फायदा घेतात. चुकीच्या मार्गाला लावतात. अवघ जीवन नरक होते. माझ्यावर विश्वास ठेव. ट्रीटमेंट सुरु ठेव. तुला नक्की अपत्य होईल."
             सीमाने डोळे पुसले. माझ्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाली, "तुम्हीच माझे आईबाप आहात."आणि ती निघून गेली. 
             नेहमीप्रमाणे मी पेशंट तपासत होतो. तेवढयात कंपाउंडर आत आला आणि म्हणाला, "डॉक्टर, सीमाने आत्महत्या केली."
              

सी. डी. पवार,
मलकापूर, ता. कराड,
जिल्हा - सातारा






































































































1 comment:

  1. अप्रतिम कथा. आपलं अभिनंदन.

    ReplyDelete

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...