Friday, October 26, 2018

कारगिल युद्ध -- एक यशोगाथा भाग २ "ऑपरेशन विजय"





कारगिल युद्ध -- एक यशोगाथा 
                                   भाग २
"ऑपरेशन विजय"  

भारतीयांना उशिरा मिळालेली खबर --
          सुरुवातीला अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवडयात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला. व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. 
          भारतीय सरकारने "ऑपरेशन विजय" या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने सुमारे २,००,००० इतक्या सैनिकांचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच सैनिकांची संख्या २०००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. 
          भारतीय वायुसेनेकडूनही "ऑपरेशन सफेद सागर" सुरु झाले. या ऑपरेशनद्वारे पायदळ सैन्याची ने-आन करण्यासाठी मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेची व्याप्ती मर्यादित होती. 
भारतीय प्रत्युत्तर --
          कारगिलचे युद्ध सुरु झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नाकी झाले. भारताने सैन्य जमवाजमविचे प्रयत्न सुरु केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्व देण्यात आले. असे केले कि हा महामार्ग सुकर होणार होता. 
          घुसखोरांनी आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच चौंक्याचा सभोतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगानी संरक्षित केला होता. यातील ८००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले. या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसरातील चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होती. वर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गालगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगिलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आला. या चौंक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व हा महामार्गही सुरक्षित होत गेला. जसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रीतीने होत गेले. 
          महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणात टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तूतुर्क या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे न्हवते. पॉईंट ४५९० व पॉईंट ५३५३ या त्यापैकी काही महत्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉईंट होता तर ५३५३ हे यद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. पॉईंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली. जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यास यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत तोफखान्याचा भडीमार चालूच होता. 

भारतीय प्रत्युत्तर उर्वरित भाग ३ मध्ये वाचा. 























No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...