Tuesday, May 16, 2023

अवीट गोडीचे गाणे -- भरजरी ग पितांबर दिला फाडुन

 

वनमालाबाई(शामची आई) व माधव वझे(शाम)

 अवीट गोडीचे गाणे -- भरजरी ग पितांबर दिला फाडुन

            'भरजरी गं पितांबर दिला फाडुन' हे अवीट गोडीचे गाणे शामची आई या चित्रपटातील आहे. साने गुरुजींच्या शामची आई या कादंबरीवर आचार्य अत्रेंनी सिनेमा काढला होता. त्या सिनेमात माधव वझेंनी शामची तर वनमाला बाईंनी आईची भूमिका केली होती. या गाण्याला संगीत दिलंय, वसंत देसाई यांनी तर याचे बोल लिहीलेत, प्रत्यक्ष प्रल्हाद केशव अत्रेंनी. हे गाणं आपल्या सुमधूर आवाजाने सजवलंय, आशा भोसले यांनी. या सिनेमातली सगळीच गाणी सुंदर आहेत. सुवर्णपदक मिळवणारा हा पहिला सिनेमा होता. पहिल्या मराठी चित्रपटाला सुवर्ण पदक मिळाले. आशाताईंचा आवाज म्हणजे प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा असा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. अगदी आज जरी ही गाणी ऐकली तरी लगेच डोळ्यांतून आपोआप पाणी येतं. 

          हे गीत म्हणजे भाऊ बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमाचा अविष्कार आहे. पहिल्या कडव्यात अत्रे म्हणतात कि, श्रीहरीचे बोट कापले असूनसुद्धा सुभद्रा पाठची बहीण असूनही चिंधी फाडून देत नाही. तिला श्रीहरीच्या बोटापेक्षा शालू नि पैठणी महत्वाची वाटते. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, पाठची बहीण झाली वैरीण. 

         दुसऱ्या कडव्यात अत्रेंनी द्रौपदीचे श्रीहरीवरील असलेल्या प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे. द्रौपदी म्हणते, हरीची मी कोण आहे तरी हरीने म्हणजेच श्रीकृष्णाने मला बहीण मानली आहे. या भावाने मला वसने म्हणजेच वस्त्रे देऊन माझी लाज राखली आहे. तोच हरी आज चिंधीसाठी माझ्याकडे आला आहे. त्याचे माझ्यावर एवढे ऋण आहे कि माझ्या काळजाची चिंधी करून हरीला देईन. द्रौपदीने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपला भरजरी पितांबर फाडला व चिंधी म्हणून हरीला दिला. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. 

          खरोखरच द्रौपदीचे हरीवर मनापासून व निःस्वार्थ प्रेम आहे. म्हणूनच तिने आपला भरजरी पीतांबर फाडून दिला. भक्ती, प्रेम असावे तर द्रौपदी सारखे. तिला भरजरी पीतांबरपेक्षा हरीवरील भक्ती, प्रेम मोलाचे वाटले. जे रक्ताच्या नात्याला अंतरीचे प्रेम कळले नाही ते मानलेल्या नात्याला कळले. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, 'रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटलि पाहिजे अंतरीची खुण' द्रौपदीची निःस्वार्थ (लाभाविण) भक्ती, प्रेम बघून हरी प्रसन्न झाले.

          प्रल्हाद केशव आत्रे यांनी जितके भावपूर्ण व अर्थपूर्ण हे गीत लिहिले आहे  तितक्याच उत्कटपणे व सुरेल आवाजात आशा भोसले यांनी हे गीत गायले आहे. अजूनही या गाण्याचे स्वर कानावर पडले कि, मन प्रसन्न, आनंदी होतं.

भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी?”
पाठची बहीण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न

 


 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...