Sunday, April 28, 2019

लेख -- महाराष्ट्र कोणाचा ?




 लेख -- महाराष्ट्र  कोणाचा ?

          'महाराष्ट्र  कोणाचा ?' ह्याचे उत्तर म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचा महाराष्ट्र. मराठी भाषेवर व मातीवर प्रेम करणाऱ्या माणसांचा. ज्यांच्या नासा-नसात व रक्तात महाराष्ट्र भिनला आहे त्यांचा. 
                     महाराष्ट्र हि संतांची भूमी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, गोरा कुंभार, चोखा मेळा, संत जनाबाई अशी संत मंडळी महाराष्ट्राला लाभली. यांच्या भजन, कीर्तन व ओव्यांनी महाराष्ट्राला शिकवण दिली. त्यांची पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच लाखोंहून अधिक वारकरी नित्यनेमाने दर आषाढी, कार्तिकेला आळंदी, देहूपासून पंढरपुरापर्यंत पायी वारी करतात. संत तुकडोजी महाराज यांनी भारुडाच्या माध्यमातून लोकजागृती केली. गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन समाजसेवा केली. 'जय जय रघुवीर समर्थ' अशी आर्त हाक देत शिवाजी महाराजांना व महाराष्ट्राला शिकवण दिली ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांचे 'मनाचे श्लोक' आजही  म्हणले जातात. सज्जनगडावर त्यांचे देहावसान  झाले. 
          आज महाराष्ट्रातून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते व संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे पोवाडे गायले जातात ते म्हणजे शिवाजी महाराज. अख्खा महाराष्ट्र मुसलमानांच्या तावडीत  होरपळत असताना शिवाजी महाराजांनी समोरासमोर आणि गनिमी काव्याने मोगलांशी लढून आपले स्वराज्य स्थापन केले. ज्यांनी अटकेपार झेंडे नेले व इंग्रजांशी दोन हात केले ते पुण्यातील राघोबादादा  पेशवे तसेच न्यायाबाबत एकनिष्ठ असणारे रामशास्त्री  प्रभुणे पुण्यातील होय. 
          आपल्या महाराष्ट्राला थोर संतांबरोबरच थोर समाजसुधारकांची  देणगी लाभली आहे. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महर्षी  धोंडो केशव कर्वे, सेनापती बापट, शाहूमहाराज, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि इतर बऱ्याच समाजसुधारकांनी दलितांसाठी, महिलांसाठी, महाराष्ट्रातील अनिष्ठ प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी धडपड केली. इंग्रजांविरुद्ध लढताना तुरुंगवासही भोगावा लागला. आदय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव हे फासावर लटकून शाहिद झाले. 
          आपल्या महाराष्ट्रात थोर साहित्यिक व विचारवंत जन्माला आले. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, राम गणेश गडकरी, ना. सी. फडके, वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, ना. धो. महानोर, ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. महाराष्ट्राची गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बरीच भावगीते, भक्तिगीते गायली. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे अजूनही डोळ्यातून पाणी काढते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून विश्वविक्रम केला. 
          महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा व लावणी. तमाशाद्वारे पूर्वी लोकजागृती केली जात असे. महाराष्ट्रात पहिल्यांदा तमाशा सुरु केला तो पठ्ठे बापूराव यांनी. आजसुद्धा काळू बाळू, दत्ता महाडिक, मंगला बनसोडे यांचे तमाशे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे लावणी. रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण, यमुनाबाई वाईकर, सुरेखा पुणेकर यांनी लावणीला साज चढवला व लावणी अजरामर केली. 
          आपल्या महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. आपली राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राला ७२० कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणसारखा निसर्गसंपन्न व पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा प्रदेश लाभला आहे. महाराष्ट्रात एकूण ३५ जिल्हे आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपुर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट, अष्टविनायक अशी तीर्थक्षेत्र आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान अशी थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रतापगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग, सिंहगड, पुरंदर असे किल्ले आहेत. अंजठा-वेरूळ लेण्या आहेत. 
          आपल्या महाराष्ट्राला संतांची, समाजसुधारकांची देणगी लाभली आहे. आपला महाराष्ट्र हा थोर विचारवंतांच्या विचारामुळे विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. महाराष्ट्राला कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने घेरले तसेच दंगलींना तर कधी दहशतवादाला धीराने तोंड दिले. महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरीही महाराष्ट्र कणखरपणे उभा राहिला. म्हणूनच आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान वाटतो व म्हणूनच आपण सारे बांधव अभिमानाने म्हणूया, 'जय जय महाराष्ट्र माझा । गर्जा महाराष्ट्र माझा ।।'












 
          











 

























          



































 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...