Saturday, March 14, 2020

'त्यांचे" कार्य छोटे ... डोंगराएवढे !

 'त्यांचे' कार्य छोटे ... डोंगराएवढे !

          ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन पार पडला. तो नेहमीप्रमाणे दरवर्षी येतो. या दिवशी महिलांचा उदो उदो होतो. फेसबूक, व्हाट्सअप, इन्स्टाग्रामवर महिलांबद्दल चांगल्या चांगल्या पोस्ट टाकल्या जातात. त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, सत्कार केले जातात. ८ मार्च पार पडला कि परत स्त्री पुरूष भेदभाव सुरू. 
          खरे तर स्त्री शिवाय घर अपूर्णच असते. घरातील प्रत्येक गोष्टीत स्त्रीचा हातभार लागलेला असतो. स्त्री जवळ जवळ निम्मा संसार सांभाळत असते. काही स्त्रिया तर नोकरी, व्यवसाय करून घर सांभाळत असतात. घरातील प्रत्येकाची आवड निवड जपत असतात. पै-पाहुणे, नातेवाईक यांचा पाहुणचार करत असतात. मुलांना सांभाळणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ह्या सर्व गोष्टी त्या जबाबदारीने पार पाडत असतात. एवढे करूनही समाजात तिला दुय्यम स्थान दिले जाते, तिची अवहेलना केली जाते. आज प्रत्येक स्त्री पुरुषांच्या बरोबरीने उभी आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती करत आहे, आपला ठसा उमटवत आहे. 
          मी रायगड जिल्ह्यातील गोरेगावला असताना अशाच दोन वयस्कर महिला आपला व्यवसाय सांभाळून घराला हातभार लावताना दिसल्या. दोघींचे अंदाजे वय ५५ ते ६० च्या दरम्यान असावे. पण दोन्ही महिला आपला व्यवसाय आनंदाने करत होत्या. 
          अधिकारी काकू ह्या घरगुती खानावळ चालवतात. त्यांच्याकडे रोज १० ते १२ जण जेवायला असतात. त्यांचा रोजचा स्वयंपाक त्या स्वतः करतात. जेवायला येणाऱ्यांना रोज ताजे व गरमागरम जेवण वाढणे, हवं-नको ते बघणे हे स्वतः लक्ष घालून बघत असतात. घरात एखादा नवीन पदार्थ केला कि हक्काने पानात वाढतात. त्यांचे जेवण रुचकर असते. दुसऱ्या मेहता आजी, ह्यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय आहे. पाऊस असो कि थंडी असो, न चुकता सकाळी लवकर येऊन पेपरचा स्टॉल लावतात. सर्व वृत्तपत्र त्या विकत असतात. मी रोज नियमितपणे त्यांच्याकडून 'सकाळ' वृत्तपत्र घेत असे. एक दोन दिवस जर नाही गेलो तर 'काल आला नाही, गावाला गेला होता का?' असे आपुलकीने विचारत असत. 
          त्या दोघी वयस्कर जरी असल्या तरी त्यांचा काम करण्याचा उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे. आज अशा बऱ्याच महिला आहेत कि आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून घर चालवतात, पण आपण महिला म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो. या दोघींचे कार्य जरी छोटे असले तरी त्यांच्यामुळे घराला हातभार लागत आहे, त्यांच्यामुळे घरात चार पैसे येत आहेत. त्यांचे कार्य छोटे जरी असले तरी डोंगराएवढे मोठे आहे म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला सलाम !


संतोष वसंत जोशी,
वाई, जिल्हा सातारा


















Monday, March 9, 2020

सण आणि उत्सव - होळी

सण आणि उत्सव - होळी

Ceaholi.jpg
 

होळी
   
होळी साजरी करताना लोक



होळी
           हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.[२] या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवडरंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

धूळवड आणि रंगपंचमी

           महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.[५] होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.[६] याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते.[७] एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. 

आख्यायिका

होळीचा अग्नी
होळी
          लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.[११]

कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव

          कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.[१२] फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. [१३]कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.[१४]
          फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.
          पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाते पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते.
          ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो.[१४] हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.[१५]
होल्टा होम-
           कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. [७]होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.[१६]
          कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात.. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.

किनाऱ्यावरील बंदरांवर होणारा शिमगा

 शिमगा उत्सव हर्णै बंदर
          कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात.[१७] मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.

केला पालखी व मुख्य विधी

          छोट्या गावचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.[१८]
          गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवली जातात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सान’ असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.
          नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.

गाऱ्हाणे, खुणा काढणे

          कोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते.[१९] शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण (चौथरा व छप्पर) देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.

विविध गावातील प्रथा

          रत्नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात.
          देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात.
          कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यांची वस्ती होती.स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’ च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो.धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही पाळतात.[२०]

आदिवासी जमातीत

          भारतातील आदिवासी जमातीत हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून स्त्री-पुरुष उत्साहाने साजरा करतात.[२१] महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो.[७] सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते.[२२]

Sunday, February 23, 2020

अवीट गोडीचे गाणे -- किती सांगू मी सांगू कुणाला

 


अवीट गोडीचे गाणे -- किती सांगू मी सांगू कुणाला 

      'किती सांगू मी सांगू कुणाला' हे गीत सतीचं वाण या चित्रपटातील आहे. मालाईने केलेली सोरटी सोमनाथाची भक्तीची कथा म्हणजेच सतीचं वाण. हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता दत्ताराम गायकवाड तर दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी होते. या चित्रपटाची कथा आबाजीराव पवार यांनी लिहिली तर पटकथा, संवाद आण्णासाहेब देऊळगांवकर यांनी लिहिले. या चित्रपटातील गीते जगदीश खेबूडकर   यांनी लिहिली तर प्रभाकर जोग यांनी संगीत दिले. या चित्रपटातील गीते आशा भोसले, सुलोचना चव्हाण व जयवंत कुलकर्णी यांनी गायली. आशा काळे, कृष्णकांत दळवी, धुमाळ, ललिता पवार, वसंत शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
          'किती सांगू मी सांगू कुणाला' हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले असून या गीताला प्रभाकर जोग यांनी संगीत दिले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे.  

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला

अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, ओठावर बासरी, भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपालकाला

खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे

लपुन छपुन गिरिधारी, मारितो ग पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला


Saturday, February 22, 2020

प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे !


प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे !

          "प्रेमात आणि युध्दात सारं काही क्षम्य असतं" हि म्हण पूर्वीपासून प्रचलित आहे. जसे घर बघावे बांधून, लग्न पाहावे करून तसेच या वाक्यात आणखी एक वाक्य घातले पाहिजे, ते म्हणजे प्रेम पाहावे करून. प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे अशी एक काव्यपंक्ती आहे. प्रेम हे फक्त प्रेमच असू शकतं त्यामुळे प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही. कारण प्रेम हे देवाने दिलेली देणगी आहे. प्रेम हा कॉलेज युवक युवतींचा आवडता विषय आहे तसेच नाटक-सिनेमा दिग्दर्शक, लेखक, कवी यांचाही आवडता विषय आहे. यांनी प्रेम या विषयाची महती सांगण्याचा बराच प्रयत्न केला आहे. पण प्रेम म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच राहते. प्रेमाचा अर्थ हा जसा निघेल तसा आहे. प्रेम म्हणजे दोन मनांचे, हृदयाचे मिलन होय. प्रेम हे आई-मुलगा, भाऊ-बहीण, नवरा-बायको, युवक-युवती यांच्यात होते. पण प्रत्येकाच्या प्रेमात वेगवेगळया भावना दडलेल्या असतात. प्रत्येकाच्या प्रेमात वासना नसून चांगल्या भावना आहेत. प्रत्येकाच्या प्रेमाचे अर्थ निराळे आहेत. प्रेम हे पवित्र नाते मानले जाते. आणि या नात्याला कोणतीच उपमा देता येत नाही. हे प्रेमाचे नाते म्हणजे देवाघरची देणगी आहे. 
          प्रेम कुठेही, केव्हाही होऊ शकतं. प्रेम हे बस स्टॉप, ऑफिस,      बाग-बगीचे, सिनेमा, नाटयगृहे, कॉलेज या ठिकाणी जमते. प्रेम जमण्याची ठिकाणे वेगळी असली तरी अर्थ एकच होतो, तो म्हणजे दोन मनांचे मिलन. जेंव्हा एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते, तेव्हाच प्रेम होते. त्यामुळेच कि काय "प्यार किया नहीं जाता, हो जाता हैं" असे हिंदी गाण्यात म्हणले आहे. प्रेमाची महती सांगणारी अनेक उदाहरणे आहेत. शिरी-फराह, लैला-मजनू, हिर-रांजा, बाजीराव-मस्तानी, मुमताज-शाहजहान, सलीम-अनारकली, अशी कित्येक उदाहरणे प्रसिध्द आहेत. यांच्या प्रेमात वासना दडलेली नव्हती. त्यामुळेच यांचे प्रेम आजही अमर आहे. त्यांनी प्रेम करताना जातपात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही. 
          प्रेमाची सुरवात हि तारूण्याच्या उंबरठयावर असतानाच होते. जेव्हा मुलगा आणि मुलगी वयात येतात तेव्हा त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते. चोरून एकमेकांकडे पाहणे, नेत्रकटाक्ष टाकणे, चोरून भेटणे इत्यादी प्रकार वयात आल्यावर घडतात. यातूनच काहीवेळा एकतर्फी प्रेमाची सुरवात होते. तो किंवा ती प्रेमाला प्रतिसाद देत नसेल तर आत्महत्या, खून, बलात्कार, जाळपोळ इत्यादी भीषण प्रकार घडतात. यात कुणालातरी आपले प्राण गमवावे लागतात. प्रेम हे त्यागातून, विरहातून निर्माण होते. जेव्हा आपण एखादया आवडत्या गोष्टीचा त्याग करतो तेव्हा त्या गोष्टीचे महत्व कळते. तसेच प्रेमाच्या बाबतीतही होते. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा त्याग करतो, तेव्हा होणाऱ्या दु:खामुळे त्या व्यक्तीबद्दल अधिकच प्रेम भावना निर्माण होतात. जी व्यक्ती प्रेम करू शकते, त्याच व्यक्तीला प्रेम विरहही सहन करता आला पाहिजे. तरच ती व्यक्ती खरी प्रेमी ठरू शकते. 
          प्रेमाच्या जोरावर सावित्रीने आपल्या नवऱ्याला यम दरवाजातून सोडवून आणले. प्रेमापुढे देव-दानव झुकले आहेत तर मानवाची काय  कथा ? काही प्रश्न युध्दामुळे सोडविणे शक्य होत नाही, तेच प्रश्न प्रेमामुळे सोडविणे शक्य होते एवढे प्रेमात सामर्थ्य आहे. त्यामुळे प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही. याचे कारण म्हणजे प्रेम हे देवाघरचे देणे आहे. देवाने दिलेली देणगी आहे. 
                                                                             
                                                                       संतोष वसंत जोशी,
                                                                       वाई, जिल्हा सातारा











 

























 

Saturday, February 15, 2020

अवीट गोडीचे गाणे -- राधा कृष्णावरी भाळली


 अवीट गोडीचे गाणे -- राधा कृष्णावरी भाळली 

      हे गीत राधा कृष्ण यांच्या मनोमिलनाचे आहे. राधेचे कृष्णावर निखळ प्रेम आहे. दोघेही प्रीतीत अखंड बुडालेले असतात. कृष्ण आपल्या बासरी वादनाने राधेला मोहित करीत असतो. राधेला कृष्ण भेटीची ओढ लागलेली असते. कधी एकदा कृष्णाला बघते असे तीला झाले असते. दोघांच्या प्रीतीची माहिती गोकुळवासीयांच्या कानी पडते. त्यांच्यात कुजबुज चालू होते. 
         दोघांचे मनोमिलन होते तेव्हा सारी सृष्टी मोहरून उठते. झाडे, वेलींना टवटवी फुटते. फुलाफुलांतून सुगंध दरवळू लागतो. कोकीळ सुस्वरात गायला लागते. पक्षीही आपल्या मधुर किलबिलाटाने सारा आसमंत उजळून टाकतात. साऱ्या आसमंतात आनंद पसरलेला असतो. दोघांचे मनोमीलन बघण्यासाठी इंद्रपुरी अवतरली. 
           राधा कृष्णाच्या मीलनावर सुंदर असे गीत पी. सावळाराम यांनी लिहिले आहे. या गीताला संगीत वसंत प्रभू यांनी दिले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुस्वर आवाजात हे गीत गायले आहे.

राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी ।। धृ  ।।

अमृत वृक्षी फुलला मोहर
कोकिलकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून फुलाफुलांतून
नवलकथा दरवळली ।। १ ।।

वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्तीची ओढ तियेची
नीळजळी थयथयली ।। २ ।।

अमरप्रीतीचे गीत लाघवी
हरि अधरीची वेणू वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली ।। ३ ।।  


 

Saturday, February 8, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी ३ ते ५)




तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी ३ ते ५)

अवघे जन गडी । घाला उडी भाईनो ।। ३ ।।
हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप आनंदाचे जळ ।। ४ ।।

अर्थ : अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहा पण या ठिकाणी उडी घालून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. कारण हरिनाम आनंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे नाही, म्हणजे मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही. 
भावार्थ : तुकाराम महाराजांना असे म्हणायचे आहे कि, हरिनामाच्या आनंदाचा पूर आत्ताच आला आहे. या पुरात तुम्ही उडी मारून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. म्हणजेच विठ्ठलनामात तल्लीन व्हा, त्याचे सतत नामःस्मरण घ्या. व हे नामःस्मरण घेताना संसारातील सर्व पाश, मोह, माया, अहंकार या सर्व गोष्टी तिथेच टाकून द्या. या सर्व गोष्टींचा त्याग केल्यावर हरीनामाचा आनंद लुटता येतो. हा आनंद मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात घेता येणार नाही व मनुष्यजन्म एकदाच मिळतो. पण या जन्मात मनुष्य संसारातच गुरफटला जातो व त्याला हरीनाम घ्यायला वेळच मिळत नाही. म्हणजेच त्याला हरीनामाचा आनंद लुटता येत नाही. अशा लोकांना तुकाराम महाराज सांगतात कि, अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहा पण या ठिकाणी उडी घालून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. कारण हरिनाम आनंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे नाही, म्हणजे मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही. 

तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ।। ५ ।।

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, जन्मजन्मांतरींच्या थोर पुण्याईमुळे ह्या भक्तीमार्गाचा ओघ आला आहे. 
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलाची भक्ती करू लागले, विठ्ठलनामात अखंड बुडू लागले. भजन-कीर्तनात दंग होऊ लागले. त्यातच त्यांचे भान हरपून जाऊ लागले. ते विठ्ठलभक्तीत एवढे रममाण होत कि त्यांना जगाचा विसर पडत असे. त्यांनी संसारातील सर्व पाश, आशा, लोभ सोडले व विठ्ठलचरणी लीन झाले. विठ्ठलालाच त्यांनी सर्वस्व मानले. त्यांनी अंतःकरणापासून केलेली भक्ती बघून विठ्ठलही भारावला व त्याने तुकाराम महाराजांना दर्शन दिले. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, "जन्मजन्मांतरीच्या थोर पुण्याईमुळे हा भक्तीमार्ग सापडला." म्हणजेच तुकाराम महाराजांनी याचे श्रेय जे काही पुण्य केले असेल त्याला दिले आहे.









































Friday, February 7, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी १ व २)

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी १ व २)

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ।। १ ।। 
बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनि जाऊं पैल थडी ।। २ ।। 

अर्थ : हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे व हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. विठ्ठलनामाची सांगड बांधून संसारसागराच्या पार तरून जाऊ. 

भावार्थ : हरीच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे म्हणजेच विठ्ठलाचे भजन गायल्याने मनाला समाधान मिळते. विठ्ठलाच्या भजनातच इतका गोडवा आहे कि माणूस भजन गाताना तल्लीन होऊन जातो. त्याचे भान हरपून जाते. भजन गाणारा व ऐकणारा दोघेही आनंदी, समाधानी होतात. भजनाच्या गोडव्याने भजन ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात. हरीचे भजन गाणाऱ्याच्या मुखातून पवित्र, निर्मळ शब्द बाहेर पडत असतात तर हे शब्द ऐकणाऱ्याच्या कानामध्ये शिरत असतात. त्यामुळे दोघांनाही परमोच्य आनंद प्राप्त होत असतो. हरीचे म्हणजेच विठ्ठलाचे भजन चालू असते तेव्हा वातावरण भारावलेले असते. वातावरण पवित्र, शुध्द होते. जेथे भजन चालू आहे तेथे वाईट, अनिष्ट गोष्टींना पायबंद घातला जातो. मनात वाईट विचार सोडून चांगले विचार येत असतात. भजनाच्या गोडव्यामुळे हरीविषयी प्रेम वाटू लागते. सागराच्या लाटा जशा उसळतात तसे भजनातील शब्दाने मनात हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत असतात. म्हणजेच हरीविषयी वाटणारे प्रेम घट्ट होत जाते. 
                  सर्वात जास्त पवित्र व निर्मळ कुठले नाम तर विठ्ठलनाम. अमृताहूनही गोड असे विठ्ठलनाम आहे. या नामात गोडवा आहे. हे नाम घेतल्याने मनाला सुख, समाधान मिळते. आनंद प्राप्त होतो. साऱ्या चिंता, विवंचना मिटून जातात. माणूस संकटात सापडला कि 'विठ्ठला, पांडुरंगा' असा धावा करतो. म्हणजेच माणसाला संकटातून सोडवण्याची ताकत(शक्ती, power) या नामात आहे. हे नाम घेतल्याने संसारातील सर्व पाश, आशा, आकांक्षा, लोभ, सर्व चिंता, विवंचना मिटून जातात. माणसाचे संपूर्ण जीवन विठ्ठलमय होऊन जाते. माणूस भक्तिमार्गाला लागतो. विठ्ठलनामामुळे संसाराचा अथांग सागर आहे तो सहज पार करून देवापर्यंत पोचतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "विठ्ठलनामाची सांगड बांधून संसारसागराच्या पार तरून जाऊ."


















तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...