Thursday, December 13, 2018

शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा भाग २




 शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा भाग २
ब्लॉग १ वरून पुढे चालू 

          स्वराज्यावर आलेले दुसरे अस्मानी संकट म्हणजे शाइस्तेखान. शाइस्तेखान अफाट सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. त्याने जाळपोळ, लुटालूट, बाया-बापड्यांवर अत्याचार चालू केले. मंदिरे उद्व्ह्स्त झाली, मूर्ती फुटू लागल्या. गावेच्या गावे घाबरून पळू लागली. शाइस्तेखान पुण्यात घुसला. त्याने आपला मुक्काम लाल महालात केला. 
          स्वराज्यावर आलेले हे अस्मानी संकट कसे परतवून लावायचे ह्या विवंचनेत शिवाजीराजे होते. अखेर महाराजांनी डाव ठरविला. स्वतः रात्रीच्या मध्याला लाल महालात शिरायचे व खानालाच उडवायचे. असा डाव ठरविला त्याप्रमाणे शिवाजीराजे लाल महालात शिरले. शिवाजीने केलेला अचानक हल्ला बघून खान जनानखान्यात बायकांमध्ये दडून बसला. महाराजांनी पडदा फाडला त्याबरोबर बायकांनी किंकाळी फोडली व खान आपली तलवार घेण्यासाठी उठला. महाराजांची नजर खानावर गेली. महाराज खानावर धावले परंतु खान घाबरून खिडकीतून पळून जावू लागला. महाराजांनी घाव टाकला पण घाव त्याच्या उजव्या हाताच्या बोटांवर बसून तीन बोटे तुटली. खान आपला जीव मुठीत धरून पळत सुटला. खानाच्या जीवावर आले पण बोटांवर निभावले. 
          पहिल्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी, "मला तुमची भीती वाटत आहे. मी घाबरलेलो आहे." असे अफझलखानाला सांगून भुलवत ठेवले तर दुसऱ्या प्रसंगात शाइस्तेखान गाफील असताना अचानक हल्ला केला. अफझलखान व शाहिस्तेखानच्या रूपात स्वराज्यावर आलेले संकट शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने परतवून लावले. 


















Tuesday, December 11, 2018

।। श्रीरामा ।।


।। श्रीरामा ।।

माझ्याकडून तुझ्याकडे झेपावणारे, 
मन हे माझे श्रीरामा,
तुझेच होऊन राहिले ।। ध्रु ।।

स्मरणात गेले तारुण्य,
सरत आले दिवस वृद्धत्वाचे,
क्षीण होऊ लागली काया, 
मन तुझ्याकडेच झेपावू लागले,
तुझेच होऊन राहिले ।। १ ।।

नाही काही माझ्याकडे,
तुझ्याचं प्रेमाशिवाय,
तेचं वाहीन तुझ्याचं चरणी,
पुष्पांच्या माळा अन,
उष्टी बोरे श्रीरामा,
येशील ना रे एकदा शबरीच्या आश्रमा? ।। २ ।।














गुणगुणावंसं गाणं -- जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ ।

जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ ।


          मेरा नाम जोकर मधील हे दर्दभरे गीत आहे. हे गाणे शैलेंद्र यांनी लिहिले असून मुकेश यांनी गायलेले आहे. ह्या गाण्याला शंकर जयकिशन यांनी संगीत दिले आहे. या गाण्यात मुकेश यांचा आवाज राजकपूरला बरोबर फिट बसला आहे. या गाण्यातील "कल खेल में हम हो ना हो" हे कडवे राजकपूर आणि मुकेश साठी अगदी तंतोतंत जुळत आहे. दोघेही या जगात नसले तरी ह्या गाण्यामुळे त्यांच्या आठवणी जिवंत राहतात. ह्या गाण्यातील शैलेंद्रने लिहिलेले बोल आणि शब्द बरंच काही सांगून जातात. म्हणूनच राजकपूर आणि मुकेश म्हणलं कि, "जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ ।" हे गीत सहज ओठावर येत आणि गुणगुणावंस वाटत. 


जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ ।
जी चाहे जब हम को आवाज दो, हम है वही हम थे जहाँ ।
अपने यहीं दोनो जहाँ, इस के सिवा जाना कहाँ ।।

ये मेरा गीत, जीवन संगीत, कल भी कोई दोहरायेगा ।
जग को हसाने बहरुपीया, रूप बदल फिर आयेगा ।
स्वर्ग यहीं, नरक यहाँ, इस के सिवा जाना कहाँ ।।

कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारें रहेंगे सदा ।
भुलोगे तुम भुलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा ।
रहेंगे यही अपने निशा, इस के सिवा जाना कहाँ ।।

गीतकार : शैलेंद्र 
संगीतकार : शंकर जयकिशन 
गायक : मुकेश 











Monday, December 10, 2018

शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा भाग १




शिवाजी महाराजांची रणनीती -- गनिमी कावा  भाग १

          गनिमी कावा म्हणजे शत्रुपक्ष गाफील असताना अचानक केलेला हल्ला. गनिमी कावा हि शिवाजी महाराजांची रणनीती होती. शिवाजी महाराजांकडे सैन्य व शस्त्रसाठा कमी होता पण त्यांना डोंगर कपाऱ्यांची पुरेपूर माहिती होती. याचा उपयोग त्यांनी लढायांसाठी केला. शिवाजी महाराजांचे मावळे डोंगर कपारीत झाडा-झुडपात लपून शत्रूवर अचानक हल्ला करत. त्यामुळे सैन्याची पाळता भुई थोडी व्हायची. 
          पुढील प्रसंगांवरून लक्षात येईल कि शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला कसे नामोहरम केले. राज्यावर अफझलखानाच्या रूपात मोठे संकट आले होते. बाया-बापड्यांची विटंबना चालवली होती. देवळे फोडली जात होती. लुटालूट जाळपोळ होत होती. संपूर्ण राज्यात आहाकार माजला होता. राज्यावरील हे संकट कसे टळले जाईल या विवंचनेत सर्व जण होते. खानाचा मुक्काम वाईत होता. शिवाजीस दगा फटका करून, कैद करून विजापुरास न्यावे असा खानाचा हेतू होता. दगा करण्याचा हेतू शिवाजी महाराजांना ठाम कळला. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांबरोबर खलबते केली आणि खानाला प्रतापगडाच्या एका सोंडेवर भेटायला बोलवायचे असे ठरले. पंताजी गोपीनाथ यांचेबरोबर खानासाठी शिवाजी महाराजांनी एक खलिता पाठविला व त्यात असे लिहिले कि, "मला आपणाबद्दल केवढा आदर व धाक वाटतो पण तुमचे सैन्य बघून मी पार घाबरून गेलो आहे. मला तुमची भीती वाटत आहे. तरी आपण एकट्यानेच गडाजवळ यावे व आपली भेट घडावी असे वाटत आहे." खानाने खलिता वाचला. शिवाजी आपल्याला घाबरतो हे पाहून खान बेहद्द खुश झाला. त्यात पंतांनी शिवाजी तुम्हाला किती घाबरतो हे तिखट मीठ लावून सांगितले. हे ऐकून तर खानाच्या मनात उकळ्या फुटू लागल्या. कधी एकदा शिवाजीला पकडतो असे खानाला झाले. 
          भेटीचा दिवस उजाडला. शिवाजीचे काय होणार? स्वराज्याचे काय होणार? ह्याच चिंतेत सर्वजण होते. शामियाना भेटीसाठी सज्ज होता. खान शिवाजीची वाट पहातच होता. शिवाजी महाराज निवडक दहा मावळ्यांसह खानाच्या भेटीसाठी निघाले. महाराज शामियान्यापाशी आले. महाराजांना बघून खान छद्मीपणे हसला. "आवो, शिवाजी आवो! इस अफझलखान कि गले लगाओ!" असे म्हणून खानाने महाराजांना आलिंगण देण्याकरिता दोन्ही हात पसरले. खानाने महाराजांना मिठी मारली व महाराजांची मान आपल्या डाव्या काखेत पकडली व घट्ट दाबली. खानाने एकदम कट्यार काढली आणि दात-ओठ खाऊन महाराजांच्या पाठीत खुपसली पण चिलखत असल्याने कट्यार महाराजांना लागली नाही. महाराजांनी अत्यंत चपळाईने भीचव्याचे तीक्ष्ण पाते खानाच्या पोटात खुपसले. खानाची आतडी बाहेर आली. पहाडासारखा खान जमिनीवर कोसळला. खानाचा सपशेल पराभव झाला. 

भाग २ पुढील ब्लॉगमध्ये 










          













Sunday, December 9, 2018

भारतीय संघाचा आधारस्तंभ -- चेतेश्वर पुजारा


भारतीय संघाचा आधारस्तंभ -- चेतेश्वर पुजारा 

          सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजाऱ्याने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून भारताला  विजयाच्या समीप आणून ठेवले. त्याची खेळी बघून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल हेसुद्धा पुजाराच्या खेळीमुळे चांगलेच प्रभावित झाले. 
          खरे तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे म्हणजे फार कठीण काम असते. यासाठी फलंदाजाकडे तंत्रशुद्ध पद्धतीनं खेळण्याचं कसब अंगी असावं लागत तसेच त्याच्याकडे संयम असावा लागतो. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर सयंमी खेळी करून विकेट टिकवणं व त्याबरोबर संघासाठी धावा काढणं हि जबाबदारी असते. याआधी राहुल द्रविडने हि जबाबदारी पेलली आहे व आता चेतेश्वर पुजारा हि जबाबदारी पेलत आहे. 
          आत्ताच्या कसोटीत चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धीराने सामना करून पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवले. त्याने दोन्ही डावात जबाबदारी पूर्वक खेळी केली. त्यामुळेच भारताला विजयाची संधी प्राप्त झाली. चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविड सारखीच तिसऱ्या क्रमांकावर येऊन संयमी व जबाबदारी पूर्वक खेळी केली त्यामुळेच इयान चॅपेल यांनी "पुजारा हा भारतीय संघासाठी दुसरा द्रविडच आहे." असे उद्गार काढून त्याचे कौतुक केले. 













Saturday, December 1, 2018

चक दे हॉकी



हॉकी खेळाडू मीररंजन नेगी 

चक दे हॉकी 

          मध्यंतरी शाहरुख खानचा चक दे इंडिया हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात शाहरुख खानने महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली. यात त्याने महिला हॉकी संघास विजेतेपद मिळवून दिले असे दाखविले आहे. खरे तर हा एका खेळाडूवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमामुळे एका हॉकी खेळाडूची सत्य घटना लोकांना बघायला मिळाली. या खेळाडूचे नाव मिररंजन नेगी. 
          माजी हॉकी खेळाडू मिररंजन नेगी यांनी आयुष्यात बरेच चढ उतार पाहिलेले आहेत. १९८२ सालच्या आशियायी स्पर्धांमध्ये हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून १-७ अशा मोठ्या फरकाने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. सर्व हॉकीप्रेमी, देशबांधव, प्रसार माध्यमांनी या पराभवास भारतीय गोलकिपर नेगी यांनाच जबाबदार धरले. त्यांच्यामुळेच सामना हरला असा ग्रह सर्वांचा झाला. त्यामुळे पाकिस्तानचा हस्तक असे हिणवत नेगींना मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. हि गोष्ट त्यांच्या मनाला एवढी लागली कि त्यांची खेळातील कारकीर्द संपुष्टात आली. त्यांची कारकीर्द संपुष्टात आली तरी त्यांच्यातील खेळाडू अजून जिवंत होता. त्यांचे पहिले प्रेम हॉकीवर होते. म्हणूनच २००४ मधील आशियायी स्पर्धेमध्ये महिला हॉकी संघासाठी सहाय्यक प्रशिक्षकाचे आव्हान स्वीकारले. महिला हॉकी संघास विजेतेपद मिळवून देत त्यांनी आपली खेळावरील निष्ठा सिद्ध केली. 




















राधा



राधा 

राधा एक भक्ती, राधा एक ध्यास,
राधेने व्यापले अवघे आकाश ।। १ ।।

राधा! भक्तीची शुद्धता,
राधा! मिलनाची आर्तता,
राधेशिवाय कृष्णाचा अधुरा प्रवास ।। २ ।।

राधा! कृष्णाची पूर्तता,
राधा! उत्कंठता, स्वच्छंदता,
राधेशिवाय कृष्णनाम ना कधी भूवरी ।। ३ ।। 


राधा कृष्ण 



तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...